आदिवासी गौरव दिनानिमित्त संगमनेरात रॅली आणि मेळावा
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – भारतीय राज्यघटना ही गोरगरीब आणि आदिवासींची कवचकुंडले आहे, मात्र काही लोक जाती-धर्माच्या नावावर राजकारण करून आपसात भेद निर्माण करू पाहत आहे. मणिपूर मधील आदिवासी महिलांवर झालेली अत्याचाराची घटना देशासाठी कलंक असून लोकशाही व राज्यघटना वाचण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
रॅली आणि मेळावा: आदिवासी गौरव दिनानिमित्त संगमनेरात पारंपारिक वेशभूषा, पारंपारिक नृत्य आणि घोषणांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक ते यशोधन कार्यालय दरम्यान झालेल्या रॅलीत शेकडो आदिवासी, शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून आदिवासी नृत्य सादर केली. त्यानंतर मालपाणी लॉन्समध्ये त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी डॉ. तांबे बोलत होते.
यांची होती उपस्थिती: यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, काशिनाथ गोंदे, नामदेव पारधी, हिरालाल पगडाल, शांताबाई खैरे, स्वाती मोरे, दशरथ गायकवाड, सुधाकर जोशी, अजय फटांगरे, संतोष हासे, दशरथ वर्पे, श्रीराम कु-हे, वैशाली साबळे आदी उपस्थित होते.
तांबे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आदिवासींच्या विकासासाठी वाडी वस्तीवर सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, आदिवासी म्हणजे रानपाखरू आहेत. पाने, फुले व निसर्गाशी त्यांचे जवळचे नाते आहे. शेतीचा शोध हा आदिवासी महिलेने लावला असून मनिपुरमध्ये झालेल्या आदिवासी महिलांवरील अत्याचारामुळे मणिपूर सरकार बरखास्त करून पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी आ. बाळासाहेब थोरात सातत्याने पाठपुरावा करत असून विधानसभेत ही त्यांनी आवाज उठवला आहे. आदिवासींच्या विकासाकरता जयहिंद कोळवाडे आश्रम शाळेची सुरुवात करण्यासह आदिवासी बांधवांसाठी एसएमबीटी हॉस्पिटल सुरू केले आहे. आदिवासी हा कष्टकरी समाज असून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. मुलींचे शिक्षण करावे व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन केले.
प्रा. बाबा खरात म्हणाले, आदिवासी समाज हा सहनशील असून तो तितकाच स्वाभिमानी व कडक आहे. शिक्षण हा आदिवासींच्या प्रगतीचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हिरालाल पगडाल, दशरथ गायकवाड, बाळकृष्ण गांडाळ , दिलीप बांबळे यांनीही मनोगते व्यक्त केली.
प्रास्ताविक आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी आभार मानले.
काँग्रेस कमिटीच्यावतीनेही प्रभात फेरी…
क्रांती दिनानिमित्त संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी नेहरू चौक येथे अभिवादन करून महात्मा गांधी चौक स्वातंत्र्य चौक या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब डांगरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

