महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – नवीन नगर रोड परिसरात नगर परिषदेने लावलेल्या काही वृक्षांची अज्ञात व्यक्तीकडून कत्तल केल्याचे समोर आले आहे. चांगली बहरू लागलेले ही झाडे रात्रीतून तोडण्यात आली असून तोडलेल्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा देखील गायब करण्यात आला असून केवळ खोड शिल्लक राहिले आहे. संगमनेर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून तातडीने संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
हरित संगमनेरला विघ्न संतोषींकडून अडथळा: ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नवीन नगर रोड परिसरात बस स्थानक चौकापासून ते खाली इथापे हॉस्पिटलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांचे रोपण करण्यात आले होते.
झाडांच्या संरक्षक जाळ्याही काढून नेल्या: रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या या वृक्षारोपणामुळे परिसर हरित बनत असल्याने काही विघ्न संतोषी लोकांनी या परिसरातील काही झाडांच्या संरक्षक जाळ्या काढून नेल्या. त्यानंतर हळूहळू हे झाडे काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. आता तर थेट चांगल्या आलेल्या बहारदार झाडांचीच कत्तल केल्याचे समोर आले आहे. अज्ञात व्यक्तींकडून वारंवार जाणीवपूर्वक असे कृत्य केले जात असल्याने मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पालिका लक्ष देणार का: ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ हा संदेश वारंवार दिला जात असताना संगमनेरात मात्र वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू आहे. पालिकेकडूनच लावण्यात आलेले वृक्ष तोडले जात असल्याने पालिका आता याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

