महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने पाठ फिरविल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरीही अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील सातव्या मजल्यावर दुष्काळ नियंत्रण वॅार रुम बनवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
वॅार रूममधून हे कामकाज होणार: राज्यातील दुष्काळाच्या छायेत असलेली गावे, तालुके, जिल्हा, विभाग या सर्वांवर या दुष्काळ नियंत्रण वॅार रुमच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. तसेच या सर्वांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहे. या वॅार रुममधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतील.
पाणीसाठ्याचे आरक्षण करणार: दुष्काळ नियंत्रण वॅार रुमसाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. नुकतेच राज्य सरकारने धरणातील पाणीसाठ्याचे आरक्षण करण्याचे आदेश दिले होते. या माध्यमातून राज्यातील उपलब्ध पाणीसाठा आणि स्त्रोत यातील पाण्याचे उपलब्धतेनुसार पिण्यासाठी, शेतीसाठी व व्यावसायिक वापराकरिता आरक्षण केले जाणार आहे.
फडणवीसांनी केली होती स्थापना: राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये या वॅाररुमची स्थापना केली होती. या वॅार रुमच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग, पुण्यातील रिंग रोड किंवा विमानतळाची कामे यासारख्या ५० हुन अधिक प्रोजेक्टचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी याचे नामांतर करून संकल्प कक्ष सुरू केला. यानंतर आता सत्तांतर झाल्यावर पुन्हा एकदा वॉररुम हे नाव कायम ठेवण्यात आले आहे.

