महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – संगमनेरच्या सहकारी पतसंस्थांच्या विश्वासार्हतेला गालबोट लावणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी राजकीय नेता, माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह आठ आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून याप्रकरणी न्यायालयात कधी सुनावणी होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या संदर्भात सरकारी वकील सरकार पक्षाचे म्हणणे मांडणार असल्याची माहिती मिळते.
यांनी केला अर्ज: 81 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात पोलिसांकडून होणारी अटक टाळण्यासाठी मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोधर कुटे याच्यासह पत्नी शकुंतला कुटे, विमल कुटे, मुलगा संदीप, अमोल आणि दादासाहेब कुटे यांच्यासह सून सोनाली या मुख्य आरोपीसह अन्य एक आरोपी नाशिक येथील सनदी लेखापाल अरुण के. बुरड यांनी हा अर्ज दाखल केला असल्याची माहिती समोर येत आहे. बुरड यांच्यावर आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप आहे.
मुख्य आरोपी पकडण्यात पोलीस अपयशी: एवढ्या मोठ्या रकमेचा आर्थिक घोटाळा समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने मुख्य आरोपींना अटक करणे आवश्यक होते. मात्र या प्रकरणात असे घडताना दिसले नाही. गुन्ह्यासंदर्भात आधीच वाच्यता झाल्याने आरोपी पसार झाल्याचे सांगितले जाते. असे असले तरी गुन्हा दाखल होऊन दहा-बारा दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील पोलिसांना आरोपींचा शोध घेता आलेला नाही. मुख्य आरोपी असलेला भाऊसाहेब कुटे हा राजकीय नेता असून मावळत्या जिल्हा परिषदेचा माजी सदस्य देखील आहे.
पोलिसांवर दबावाची चर्चा: राजकीयदृष्ट्या वजनदार असलेल्या व सहकारातील विविध संस्थांवर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत पदाधिकारी राहिलेल्या या नेत्याला व त्याच्या कुटुंबीयांना अटक करू नये, यासाठी पोलिसांवर दबाव असल्याची देखील चर्चा होताना दिसते. एरव्ही सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांना मुख्य आरोपीचा शोध लावणे फारसे कठीण नाही. यातच या गुन्ह्याचा तपास संगमनेर शहर पोलिसांकडून काढून पोलीस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.
अर्जावरील सुनावणीकडे लक्ष: या पार्श्वभूमीवर संधी मिळताच मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याने स्वतःसह कुटुंबीयांना अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्याचे बोलले जात आहे.
म्हणणे मांडणार: यासंदर्भात सरकारच्यावतीने सरकारी वकील आपले म्हणणे न्यायालयासमोर सादर करणार आहे. या जामीन अर्जावर कधी सुनावणी होते आणि काय निर्णय होतो याकडे संस्थेतील ठेवीदार सभासदांसह संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

