महाराष्ट्र संवाद न्यूज
अकोले (अहमदनगर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी देशातील व राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आयुष्यमान भव: हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्याचे अनेक उपक्रम राबविले जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी आयुष्यमान भव: योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अकोले नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी केले.
यांची उपस्थिती: अकोले ग्रामीण रुग्णालयात आयोजित “आयुष्यमान भव:” उपक्रमाचा शुभारंभ वडजे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्राध्यापक सुरेश खांडगे होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब मेहत्रे, नगरसेवक चौधरी, माजी नगरसेवक परशराम शेळके, नवनाथ मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोपेरे, करवंदे, डॉ. राहणे, डॉ. प्रज्वल मुंढे आदी यावेळी उपस्थित होते.
वडजे म्हणाले, अकोले ग्रामीण रुग्णालयात उत्तम पद्धतीने रुग्ण सेवा दिली जात असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब मेहत्रे यांच्या रुग्णसेवेचा नावलौकिक तालुक्यात वाढल्याने ग्रामीण रुग्णालयाकडे लोकांचा कल वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यमान भारत या संकल्पनेतून देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. या योजनेअंतर्गतच आयुष्यमान भव: हा उपक्रम देशवासियांसाठी सुरू करण्यात आला आहे.
नगरपंचायतीचा सहभाग: दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. आयुष्यमान भव: अंतर्गत अनेक उपक्रम राबविले जाणार असून आवश्यक तेथे अकोले नगरपंचायत देखील सहभाग देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रा. खांडगे म्हणाले, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुण्य आणि समाधानाचे काम करण्याचे भाग्य लाभते. कोणत्याही विभागाचा करता जर कर्तबगार असेल तर त्या विभागात कोणत्याही प्रकारे अडचण येत नाही. तेथे निश्चित चांगले काम होत असते. असेच काम अकोले तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. मेहेत्रे यांनी रुग्णालयाचा कायापालट केला असून त्यांच्यामुळे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
अवयव दान उपक्रम: केंद्र व राज्य सरकारच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आयुष्यमान भव हा उपक्रम सुरू होत असून या उपक्रमांतर्गत स्वच्छतेपासून अनेक आरोग्याचे उपक्रम होणार आहेत. अवयव दान ही सुंदर संकल्पना असून आपणास मरणोत्तर जिवंत ठेवणारा हा उपक्रम आहे. त्यामुळे प्रत्येकाने अवयव दानाचा संकल्प करावा असे आवाहन खांडगे यांनी केले.
सूत्रसंचालन डॉ. संदीप कडलग यांनी केले. तसेच अवयवादानाची त्यांनी शपथ दिली. आभार रुग्णालयाचे फार्मासिस्ट पाटील यांनी मांडले.

