महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – वैवाहिक जीवन एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असते. त्यात संशय निर्माण झाला की प्रेमाच्या आणाभाका घेणारी जोडपीही परस्परांकडे संशयाने पाहू लागतात आणि त्यातून संसारातील गोडवा नाहीसा होतो. अशाच कथानकाचा समावेश असलेल्या आणि सरतेशेवटी नातेसंबंधातील विश्वास जपण्याचा संदेश देणार्या केदार शिंदे लिखित, भरत जाधव यांच्या तब्बल चौदा वेगवेगळ्या भूमिकांचा समावेश असलेल्या ‘तू तू मी मी’ या धमाल विनोदी नाट्यप्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी प्रेक्षागारात हास्याचे कारंजे फुलवले. कमलाकर सातपुतेसह अन्य तिघांनी वठवलेल्या भूमिकेने उपस्थित प्रेक्षकांना मनात डोकवायलाही भाग पाडले.
राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित संगमनेर फेस्टिव्हलमध्ये शनिवारी अभिनेता भरत जाधव, कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण, रुचिरा जाधव आणि ऐश्वर्या शिंदे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या, मराठी रंगभूमीवर गेली 25 वर्ष धुमाकूळ घालणार्या ‘तू तू मी मी’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
दोन विवाहित जोडप्यांच्या वैवाहिक जीवनाचे चित्रण असलेल्या या धमाल नाटकात दोन्ही जोडप्यांना वाटते की आपला जोडीदार अयोग्य आहे. त्यातूनच त्यांच्यातील दुरावा वाढीस लागल्याचे त्यांचे मत असते. परिणामी दोन्ही जोडपी परस्परांपासून वेगळे होण्यासाठी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. धमाल म्हणजे दोन्ही जोडपी त्यांचे प्रकरण हाताळण्यासाठी एकाच वकिलाची निवड करतात. वकिलाच्या भूमिकेत रंगमंचावर अवतरणारा भरत जाधव चौघांच्याही तक्रारी ऐकून घेतो आणि त्यांना एकमेकांचे जोडीदार बदलून पंधरा दिवस एकत्र राहण्याचा सल्ला देतो.
या 15 दिवसांच्या कालावधीत घडलेली धमाल आणि आपल्या जोडीदारापासून दूर राहून झालेला विश्वासाचा साक्षात्कार उपस्थितींना अंतर्मुख करतो. विनोदी अभिनेता कमलाकर सातपुते आणि रुचिरा जाधव व निखिल चव्हाण आणि ऐश्वर्या शिंदे यांनी जोडप्यांच्या भूमिकेत काम केले आहे. अभिनेता भरत जाधव यांनी अगदी वकिलापासून ते घरगडी गंगापर्यंत साकारलेल्या वेगवेगळ्या चौदा भूमिका, क्षणात बदलणारा त्याचा पेहराव आणि रंगमंचावरील बदलती पार्श्वभूमी प्रेक्षकांना थक्क करणारी होती.
शेवटी, एक चांगला शेवट आणि त्यातून अर्थपूर्ण संदेश देण्याचाही प्रयत्न या नाट्यप्रयोगातून करण्यात आला आहे. नातेसंबंधामधील परस्पर विश्वासावर जोर देणारे हे नाटक प्रेक्षकांना उत्तम आणि यशस्वी वैवाहिक जीवन जगण्यासाठी एकमेकांवरील विश्वासाचे महत्त्व पटवून देते. भर पावसांत दोन तास चाललेल्या या धमाल विनोदी नाटकाने संगमनेरकरांना खळखळून हसवतांना त्यांच्यात विश्वास भरण्याचेही काम केले.


