महाराष्ट्र संवाद न्यूज
समन्यायी पाणी वाटपाचे तत्व हे तत्कालीन काळजीवाहू सरकारच्या काळात अधिकारी पातळीवर ठरविले गेले होते. हे तत्व आपल्याला देखील मान्य नसल्याने या विरोधात सर्वप्रथम संगमनेरनेच आंदोलने करीत आवाज उठविला असल्याचे स्पष्ट करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण निळवंडे धरण आणि कालव्यांचा प्रश्न मार्गी लावल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, उत्कर्षा रुपवते, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सुरेश थोरात आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हिराबाई व मीनानाथ वर्पे, सुरेखा व डॉ. तुषार दिघे, लताताई व माणिकराव यादव, सिंधुताई व संभाजीराव वाकचौरे, मंदाताई व शेखर वाघ या संचालकांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
थोरात म्हणाले, तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर मागील 56 वर्षांपासून कारखाना यशस्वी वाटचाल करीत असून सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक आणि जनतेचा विश्वास हेच आपले मोठे भांडवल आहे. नवीन कारखान्यासोबत को-जनरेशनचा निर्णय योग्य ठरला. नवीन कारखान्यातून मागील सात वर्षात 73 लाख मे. टनाचे गाळप झाले मागील असून को-जनरेशनला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी पाऊस कमी झाला असून दुष्काळी परिस्थितीमुळे हा हंगाम कठीण आहे .
निळवंडे धरण व कालवे हे आपण दुष्काळी भागातील जनतेसाठीच बांधले. शेतकरी व सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी हे काम पूर्ण केले. खरे तर मे महिन्यामध्ये दहा टीएमसी पाणी शिल्लक होते, त्यावेळेस सर्व बंधारे, नाले भरून घेता आले असते. मात्र संगमनेर तालुक्यात साजरा झालेला आनंदोस्तव काहींना पाहावला नाही. त्यामुळे पाणी बंद केले गेले.
क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांचा तालुका धाडसाने सामोरे जाऊ…
सध्या आपल्यासमोर अनेक अडचणी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मात्र क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांचा हा तालुका आहे. येणाऱ्या कठीण परिस्थितीला आपण धाडसाने सामोरे जाणार आहोत. सत्ता येते आणि जाते, मात्र आगामी काळ हा आपलाच असून काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे सांगताना आपण कधीही कुणाची वाईट केले नाही. चांगले करण्यासाठीच गणेश परिसरात आपण गेलो आहोत असेही ते म्हणाले.
राजहंस हा केवळ सहकाराचा ब्रँड नसून…
माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सर्वाधिक 2835 रुपये भाव दिला आहे. निळवंडे धरण कोणी केले हे सर्वश्रुत आहे. काही लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनता त्यांना ओळखून आहे. राजहंस हा केवळ सहकाराचा ब्रँड नसून तो विवेकाचादेखील ब्रँड आहे. दुष्काळी तालुक्यातील सहकार राज्यात प्रथम क्रमांकाचा केवळ नेतृत्वामुळे ठरला आहे. सरकारने सुरू केलेली खाजगी शिक्षणाची व कंत्राटीकरणाची पद्धत अत्यंत चुकीची असल्याची टीकाही डॉ .तांबे यांनी केली.
यावेळी बाबा ओहोळ यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.


