महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर -संगमनेर शहर पोलीस ठाणे लागत असलेल्या दुय्यम कारागृहातील गज कापून पलायन करणाऱ्या चौघा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर आता त्यांचे साथीदार रडारवर आले आहे. आरोपींना पलायन करण्यासाठी मदत केल्याच्या कारणावरून शहर पोलिसांनी आणखी तिघा जणांना शनिवारी रात्री अटक केली आहे.
पळून जाणाऱ्या चार आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या दोघांना अहमदनगर एलसीबीने जळगावमध्ये पकडले होते. हे सर्व सहा आरोपी पोलीस कोठडीत असतानाच आता त्यांना मदत करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान पकडलेल्या आरोपींविरोधात आयपीसी 224 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात नव्याने भारतीय दंड विधान कलम 307, 120 ब तसेच शस्त्र अधिनियम 3/25 ही कलमे वाढविण्यात आली आहे.
कलीम अकबर पठाण, हलीम अकबर पठाण (दोघे रा. संगमनेर) व प्रथमेश राऊत (रा. घुलेवाडी, संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहे. अटक करण्यात आलेले तिघेही या गुन्ह्यातील मुख्य आरोपींसोबत वेगवेगळ्या गुन्ह्यात काही काळ अटकेत होते. यावेळी दुय्यम कारागृहामध्ये त्यांच्यात ओळख झाली. या ओळखीतून त्यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली असल्याचे संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींनी मुख्य चार आरोपींना दुय्यम कारागृहातून पळून जाण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले होते. गाडीच्या नंबर प्लेट बदलविण्यासाठी मदत केली. मुख्य आरोपींना तारखांवेळी न्यायालयात हजर केले असता चोरून लपून त्यांच्याशी चर्चा करणे, पलायना संबंधीचा पुढील प्लॅन ठरवणे, आरोपींना पळून जाण्यासाठी पैशाची व्यवस्था करून देणे आदी प्रकारची मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
संगमनेर पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.






