महाराष्ट्र संवाद न्यूज
धांदरफळ बुद्रुक येथील ५०० गरीब व कुटुंबीयांना दीपावलीचा फराळ व भाऊबीज निमित्त साड्यांचे वाटप करत या कुटुंबीयांचा दीपावली सण आनंदी व गोड करण्यात आला. या कुटुंबीयांसमवेत व बालगोपाळांसोबत फटाके फोडत दिवाळी साजरी करत संगमनेरमधील स्वदेश सेवाभावी सामाजिक संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी यावर्षीही जोपासली.
वाढती महागाई समवेत शेतीतील कमी होत असलेले उत्पन्न, या अनुषंगाने निर्माण होणारे ग्रामीण भागातील अनेक प्रश्न या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकरी, सर्वसामान्यांची दिवाळी आर्थिक अडचणीची ठरत असते. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ वर्षापासून स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांच्या माध्यमातून धांदरफळ गावातील हिंदू-मुस्लिम समाजातील गरीब, होतकरू, विधवा, अपंग, निराधार अश्या ५०० परिवारात दीपावलीनिमित्त फराळ वाटप व भाऊबीज साडी भेट देऊन दीपावली साजरी केली जाते.
२०१४ मध्ये स्वदेश सामाजिक सेवा संस्थेची स्थापना झाल्यापासून गावात सामाजिक उपक्रम हाती घेत शिक्षण, आरोग्य, वृक्षारोपण, विविध कलागुणांचा विकास, धार्मिक पर्यटन सहल, तीर्थक्षेत्र पर्यटन विकास अशा सामाजिक उपक्रमातून स्वदेश उद्योग समूह आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. गावचे भूमिपुत्र देशमाने यांनी आपल्या मायभूमीत दिवाळी गोड आणि आनंददायी करण्याचा मनोदय व्यक्त केल्याने धांदरफळ गावात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा दीपावली सण उपक्रम हाती घेण्यात आला.
अनिलराव काळे, अनिलराव देशमुख, संतुजी नाईकवाडी, भानुदास शेटे, ओम जाजू, संजय देशमुख, जयदेव डेरे, पोपट वाकचौरे, सरपंच उज्वला देशमाने, ओंकार देशमाने, शरद कवडे, जावेद तांबोळी आदींनी यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या. तर विजय कोल्हे, रावसाहेब डेरे, भारत कोल्हे, अतुल देशमुख, भारती भोपळे, रंजना मेहत्रे, संगीता गायकवाड, सुरेखा तोरकडी, नवनाथ देशमाने, नाना वाकचौरे, संजय भोपळे, संतोष नाईकवाडी, विलास शिंदे, डॉ. संजय थोरात, गोपीनाथ नाईकवाडी, आशिष गोसावी, नितीन देशमुख, सचिन काळे, महादेव शिंदे, अविनाश देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केले तर दिपाली वाकचौरे यांनी आभार मानले.
सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा, शक्ती…
प्रत्येक कुटुंबामध्ये सुखाचा आनंदाचा क्षण दिवाळी सणात यावा, या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात गावातील महिला भगिनींना भाऊबीज भेट देऊन करत आहे. एखादा माणूस आर्थिक परिस्थितीने मोठा होत असताना त्याने मायभूमी आणि आपल्या गावाला किंवा समाजातील घटकांना कधीच विसरता कामा नये. त्या माणसाची ओळख गावाच्या नावाने असते. मी देखील अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलो, याची मला जाणीव आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून माझ्या उद्योग समूहाच्या माध्यमातून व स्वदेश सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न असतो. या माध्यमातूनच गोरगरिबांच्या कृपाशीवादामुळे मला आनंद मिळतो तसेच सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा, शक्ती मिळत असते.
बाळासाहेब देशमाने.






