महाराष्ट्र संवाद न्यूज
राहाता – गेली आठ वर्ष प्रवरेने गणेश कारखाना चालवताना, गणेशच्या सभासद, शेतकरी बांधवांना प्रवरेपेक्षा 200 ते 300 रुपये कमी भाव देऊन गणेश परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो कोटी रुपयांची लूट केली, गणेशच्या तत्कालीन अध्यक्षांनी तेव्हा प्रवराच्या नेतृत्वाला जाब का विचारला नाही? तुमचे तोंड तेव्हा गप्प का होते? असा सवाल करत नऊ वर्ष सभासद, शेतकरी आणि कामगारांची पिळवणूक करणाऱ्यांनी गणेश कारखान्याचा कळवळा असल्याचा खोटा आव आणू नये, असा टोला गणेश साखर कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांनी सदाफळ यांना लगावला.
गणेशचे अध्यक्ष लहारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गणेश कारखान्यासमोर दररोज अडचणींचा डोंगर उभा केला जात आहे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांची खंबीर साथ मिळाल्यामुळेच गणेशचे धुराडे पेटू शकले. थोरात-कोल्हे जोडीचा पायगुण चांगला म्हणून गणेश कारखान्यात परिवर्तन झाले आणि गणेशच्या सभासद, शेतकरी आणि कामगारांची छळातून मुक्तता झाली. गणेशच्या सभासद आणि कामगारांना आम्ही सन्मानपूर्वक साखर दिली. या सभासदांचे आशीर्वाद होते, कामगारांची मेहनत होती म्हणून गणेश कारखाना सुरू झाला. साखर वाटून आम्ही त्यांचे तोंड गोड केले आणि आभारही मानले, गणेश कारखाना हा संगमनेर आणि संजीवनीप्रमाणे भाव देईल हे आम्ही अगोदरच सांगितलेले आहे. प्रवरेवरून आदेश आला म्हणून भुई थोपटण्याचे उद्योग सदाफळ यांनी करू नये, गणेशच्या माध्यमातून आम्हाला राजकारण करायचे नाही, आमचे नेते बाळासाहेब थोरात आणि विवेक भैय्या कोल्हे यांनी शेतकरी, कामगार आणि सभासदांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला आम्हाला दिला आहे.
आम्ही अजून गप्पा आहोत त्याचा आदर करा. प्रवरेचे आणि तुमचे आठ वर्षातील उद्योग आणि गणेश कारखाना सुरू होऊ नये यासाठी तुमच्या नेतृत्वाने केलेली कटकारस्थाने जनतेच्या दरबारात आम्हाला मांडायला भाग पाडू नका. गणेशचे तत्कालीन अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ यांनी माहिती घेऊन बोलायला हवे, नाहक स्वतःचे हसे करून घेऊ नये. प्रवरा सहकारी साखर कारखान्याने गणेश कारखाना चालवायला घेतल्यानंतर प्रवरा कारखाना आणि गणेश कारखान्याच्या भावातली तफावत त्यांनी समजून घ्यायला हवी होती. 2014-15 मध्ये प्रवरेने 2155 रुपयांचा भाव दिला तर गणेशच्या उत्पादक सभासदांना 1924 रुपये मिळाले. 2015-16 मध्ये प्रवरेचा भाव 2245 रुपये तर गणेशचा भाव 2039 रुपये होता. प्रवरा कारखाना आणि गणेश युनिट यांच्या भावातील तफावत कायम 200 ते 300 रुपये दरम्यान राहिली.
जर गणेश कारखाना हे प्रवरेचेच युनिट म्हणून चालविले गेले तर हा भावाबाबतीतला दुजाभाव कशासाठी? गणेश कारखान्याचे अध्यक्ष या नात्याने आदरणीय मुकुंदराव सदाफळ यांनी गणेश उत्पादकांच्या हितासाठी प्रवरेच्या नेतृत्वाला एकदा तरी जाब विचारला का? सदाफळ यांच्या वक्तव्याची मला कीव येते. ते आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत, गणेश कारखान्यावर कर्ज नाही असे ते म्हणत असतील तर मग प्रवरा कारखाना 82 कोटी रुपये कशाचे मागतो आहे? याचे उत्तर त्यांनी द्यावे.
गणेश कारखान्यातून राहुरी कारखान्याला पाच कोटी रुपये नेमके कशाचे दिले? गणेश कारखान्याचे बॉयलर आणि इतर मशिनरी परस्पर का पळविली गेली? सभासदही नसलेल्या खासदार सुजय विखे यांना सह्यांचे अधिकार का दिले? मोलेसेस किंवा साखरेचा एकही दाणा कारखान्यात का शिल्लक राहिला नाही? जीएसटी आणि इतर शासकीय देणे का थकविले गेले? राज्य सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या शेअर्सच्या रकमा परस्पर का मोडल्या? कदाचित सदाफळांना हे सर्व माहीत नसावे त्यांनी अभ्यास केलेला नसावा, शासकीय ऑडिटरने केलेला ऑडिट रिपोर्ट त्यांनी काळजीपूर्वक वाचावा, त्यांच्याकडे त्याची प्रत नसेल तर कारखान्यावरून त्यांना प्रत उपलब्ध करून देण्याची काळजी आम्ही घेतो. मात्र खोटे आणि चुकीचे आरोप त्यांनी करू नये, गणेश कारखान्यात आठ वर्षात काय घडले हे त्यांना माहीत नसेल तर याचा अर्थ असा होतो की सदाफळ हे फक्त सह्या करण्यापुरते अध्यक्ष होते, डोळे झाकून अनेक ठिकाणी त्यांनी सह्या केल्या. निदान आता तरी प्रवरेच्या नेतृत्वाला त्यांनी ठणकावून सांगावे माझ्या नावाने गणेशच्या संचालक मंडळावर कोणतेही आरोप करू नका.
उसाची पळवापळवी थांबवा, प्रवरेच्या नेत्याला जाब विचारा…
आता दुष्काळाचे सावट आहे, परिसरात ऊसही कमी आहे अशा काळात प्रवरा सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना अमिष दाखवून गणेश परिसरातील ऊस पळवत आहे. ज्येष्ठ नेते थोरात आणि युवा नेते कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील साखर कारखान्यांनी या काळात गणेश कारखान्याला सहकार्य करण्याची भूमिका घेत त्यांच्याकडे नोंद असलेला ऊस गणेशलाच घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुकुंदराव सदाफळ यांनी प्रवरेच्या नेतृत्वाला हा जाब विचारला पाहिजे, गणेश परिसरातील ऊस पळवण्याचे धंदे थांबवले पाहिजे, असेही सुधीर लहारे म्हणाले.

भावाची चिंता तुम्ही करू नका…
गणेश परिसरातील शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या मंडळीनी गणेशच्या भावाची चिंता करू नाही. आम्ही गणेश चालवतो तो सभासद, शेतकरी आणि कामगारांच्या आनंदासाठी. गणेश कारखाना हा संगमनेर आणि संजीवनी इतका भाव देणार आहे. आम्ही काटा मारणार नाही, कमी रिकव्हरी दाखवून आम्ही लूट करणार नाही.
नेत्यांना सांगा आडकाठ्या आणू नका…
तत्कालीन संचालक मंडळाने गणेश कारखान्याबद्दल पूतना मावशीचे प्रेम दाखविण्यापेक्षा प्रवराच्या नेतृत्वाला गणेशच्या कारभारात आडकाठ्या आणू नका असे स्पष्ट शब्दात सांगावे. ऊस तोडणीच्या टोळ्या पळवणे, कोर्टबाजी करणे, कर्ज प्रकरणात खोडा घालने हे असले धंदे आपल्या नेतृत्वाला बंद करायला लावावे, असेही सुधीर लहारे म्हणाले.

