महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई : राज्यात वितरित होणाऱ्या दुधापैकी 30 टक्के दुधात भेसळ असल्याची स्पष्ट कबुली दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (21 नोव्हेंबर) दूध उत्पादकांच्या बैठकीत दिली आहे.
या संदर्भातील वृत्त दैनिक महानगरने दिले आहे. दूध भेसळ शोधण्याची जबाबदारी सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे आहे. पण आता दुधातील भेसळ रोखण्याचे काम दुग्धविकास विभागावरच सोपवण्याच्या हालचाली सुरु आहेत.
मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दूध दर आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नाबाबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्यस्तरीय बैठक पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त अजित पवार, अन्न औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे आदींचा दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत विखे पाटील यांनीच दूध भेसळीच्या संदर्भातील धक्कादायक माहिती दिली. राज्यात तीस टक्के दूधात भेसळ होत असल्याचे दुग्धविकास मंत्र्यांनीच या बैठकीत सांगितल्याची माहिती बैठकीत सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे भेसळ रोखण्यात अपयश
राज्यात दररोज 1 कोटी 30 लाख लिटर दुधाचे संकलन होते. दुधातील भेसळ रोखण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे आहे. मात्र, अन्न आणि औषध विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. एका जिल्ह्यात दोन-तीनच अधिकारी असल्याने दूध भेसळ रोखण्यात अपयश येते. त्याशिवाय अनेकांचे अनेक ठिकाणी लागेबांधे आहेत. त्यामुळे दूधात भेसळ सुरू असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.
भेसळ रोखण्याची जबाबदारी दुग्ध विकास विभागाकडे?
दुधातील भेसळीमुळे वर्षानुवर्षे शेतकरी आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. नागरिकांना वर्षानुवर्षे विषारी दूध पाजले जात आहे. हायड्रोजन पेराँक्साईड, युरीया अशा विविध रसायनांचा वापर दुधामध्ये होतो. अनेक ठिकाणी बनावट दुधाची निर्मिती होते. मिल्को मीटरमध्येही अनागोंदी आहे. दुधातील भेसळ रोखण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाकडून काढून घेऊन ते आता दुग्ध विकास विभागाकडे देण्याची योजना असल्याचे दुग्ध विकास मंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. मिल्को मीटरची तपासणी करण्याचे काम वजन मापन वैधता विभागाकडे आहे. हे कामही या विभागाकडून काढून घेण्यात येणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
विखे पाटील म्हणाले…
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दुधातील भेसळ रोखण्यात यश आले तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भाव देणे शक्य होईल. त्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समित्या तयार केल्या जातील. मिल्को मिटर व वजन मापाच्या त्रुटी दूर केल्या जातील. दुधाचे गुण प्रत ठरवितांना ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ वरून ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ करण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्यात येतील. दूध भूकटी निर्याती संदर्भात केंद्र सरकार सोबत चर्चा करू.

