महाराष्ट्र संवाद न्यूज
नागपूर : सरकार आल्यानंतर छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये साडेचारशे रुपयांना गॅस सिलेंडर देणार असल्याची जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत केली आहे. मग महाराष्ट्रातील जनतेने काय पाप केलं? असा सवाल भाजपाला उपस्थित मराठा विरुद्ध ओबीसी आवाज जाणीवपूर्वक घडवून आणला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पटोले नागपूरमध्ये प्रसार माध्यमांसोबत बोलत होते. ते म्हणाले, वाद निर्माण करून सरकारला जनतेचे मूळ प्रश्न विचलित करायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये गरीब ही जात असल्याचे सांगितले. तेव्हाच कळलं की, देशातील आरक्षण व्यवस्था संपवण्यास सुरुवात झाली आहे. या देशात गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्गच सरकारला ठेवायचे आहे.
“मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये सरकार आल्यानंतर ४५० रूपयांना गॅस सिलिंडर देऊ अशी जाहीरातबाजी भाजपाने केली आहे. मग, महाराष्ट्रातील जनतेनं काय पाप केलं आहे? महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आहे. महाराष्ट्रात ४५० रूपयांना गॅस सिलेंडर का देत नाही?” असा प्रश्न नाना पटोलेंनी भाजपाला विचारला आहे.
“उज्ज्वला गॅस योजनेत केवळ २० टक्के सिलिंडर रिफील केली जातात. ही योजना फसली आहे. पण, उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांना मिळणारे केरोसिन मात्र भाजपा सरकारने बंद केले आहे. नफा कमावणे हे सरकारचे काम नाही. पण, २०१४ पासून सरकार नफा कमावण्याचे काम करत आहे, जनतेची लूट करून नफा कमावणे हे भयावह आहे,” असेही नाना पटोलेंनी म्हटलं.
“राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे. भाजपाने मराठा, ओबीसी, धनगर समाजाला जी आश्वासने दिली ती पूर्ण करावीत. कोणाच्या तोंडचा घास हिसावून घेणार नाही हे सरकार म्हणत आहे, तर नेमकं काय करणार हे जनतेसमोर स्पष्ट करावे,” असं आव्हान नाना पटोलेंनी सरकारला दिलं आहे.

