महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ७ डिसेंबर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबरोबरच संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संगमनेरच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभारणार असल्याचे सांगत आणखीही महापुरुषांची स्मारके उभारणार असल्याची ग्वाही नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन प्रसंगी तांबे बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, श्रीमती कुसुम माघाडे, के. एस. गायकवाड, विनय घोसाळे, विलास दारोळे, विनोद गायकवाड, भास्कर बागुल आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार तांबे म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही व राज्यघटना देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा व मानवतेचा विचार सर्वांनी पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासह सुशोभीकरण, संविधान प्रतिमा व स्वातंत्र्य सैनिक स्मारक होणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य दिले. तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली. हा समतेचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. राष्ट्रबांधणीच्या विचारावर आजच्या दिवशी देवाण-घेवाण होणे महत्त्वाचे आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुशोभीकरण केले जाणार असून भव्य स्मारक उभारले जाणार आहे. तसेच याच परिसरात संविधानाची प्रतिमा तयार करून त्याच्या जवळच शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे अद्यावत व आकर्षक स्मारक निर्माण केले जाणार आहे.
बस स्थानकाच्या परिसरात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा करण्याचे नियोजित आहे. तर याच परिसरामध्ये संगमनेर तालुक्यातील स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेले तसेच शहीद झालेले स्वातंत्र्य सैनिक यांच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव स्मारक उभारले जाणार आहे. याचबरोबर या स्मारक परिसरात शंभर फुटी तिरंगा झेंडा उभारण्याचा मानस असल्याचेही तांबे यांनी सांगितले.

