महाराष्ट्र संवाद न्यूज
नागपूर, दि. १२ डिसेंबर – संगमनेर तालुक्यात नांदूर खंदरमाळ जवळ वारकऱ्यांच्या दिंडीला झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अधिवेशनात जाहीर केली. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे सांगितले. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.
कार्तिकी एकादशी निमित्ताने शिर्डीहून आळंदीला जात असलेल्या दिंडीमध्ये ३ डिसेंबरला कंटेनर घुसल्याने चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर या अपघातात दहा वारकरी जखमी झाले होते. वारकऱ्यांवर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत होते.
आमदार थोरात यांनी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात प्रश्न उपस्थित करत मदतीची मागणी केली. थोरात म्हणाले, अपघातामध्ये वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर दहा वारकरी जखमी झाले. अत्यंत गरीब कुटुंबातील हे वारकरी असून अपघातानंतर आपण स्वतः त्यांच्या कुटुंबियांना भेटावयास गेलो होतो.
मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी, यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी संपर्क साधला होता. मात्र अद्याप पर्यंत ही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्री महोदयांनी ही मदत जाहीर करण्याची मागणी थोरात यांनी सभागृहात केली.
थोरात यांनी केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यासंदर्भात सभागृहात निवेदन करत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे मदत जाहीर केली. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासन स्वतः करणार असल्याचे सांगितले.
आमदार थोरात आणि मुख्यमंत्री शिंदे नेमक काय म्हणाले बघा हा व्हिडिओ…

