महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुरुवारी दुपारी हल्ल्याचा प्रयत्न झाला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या दोघांना बाजूला घेतल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी देखील मुख्याधिकाऱ्यांच्या कारवाईत अडथळा करीत दोघाजणांनी त्यांच्या अंगावर कागदाचा गठ्ठा भिरकावत धावून जात “तुझे देख लुंगा, मै फिर यही दुकान लगाऊंगा” अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात रात्री दिलेल्या फिर्यादीवरून शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी आणि सारिज एजाज शेख उर्फ साऱ्या (दोघे रा. लखमीपुरा, संगमनेर) यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकारामुळे जोर्वे नाका प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या परिसरात असलेल्या अतिक्रमण धारकांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता त्यातूनच जोर्वे येथे जाणाऱ्या काही नागरिकांवर येथील अतिक्रमण धारकांकडून हल्ला करण्यात आल्याने दंगलीचा प्रकार निर्माण झाला होता. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात या परिसरातील अतिक्रमणे काढून टाकली होती. या परिसरात पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी पालिका नजर ठेवून होती.
मात्र या परिसरात लखमीपुरा कब्रस्तानची भिंत तोडून लखमीपुरा ट्रस्टचे विश्वस्त मुस्ताक व इतर भोगवटादारांनी पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून ती जागा भाड्याने दिली होती. तेथे आरोपींनी ‘इंडिया पाटा’ नावाने दुकान थाटले होते. यामुळे यासंदर्भात स्थानिक २४ नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करत अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती.
त्यामुळे पालिकेने संबंधितांना नोटीस देत अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेच्या पथकाने गुरुवारी घटनास्थळी जात संबंधितांना सामान काढून घेण्यासाठी आवश्यक वेळ दिला. दोघाही अतिक्रमण धारकांना अंतिम संधी दिल्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली असता रफिक सुन्नी आणि साऱ्या याने मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर कागदांचा गठ्ठा भिरकावत धावून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच धावपळ उडाल्याने त्या नावाचे वातावरण निर्माण झाले होते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या या दोघांना पकडत बाजूला केले. या प्रकारामुळे अतिक्रमण हटविण्याची कारवाई थांबविण्यात आली.
दरम्यान या घटनेनंतर अतिक्रमणातून घडणारे पुढील अनर्थ टाळण्यासाठी सर्वच अतिक्रमणे नेस्तनाबूत करण्याची व अतिक्रमण धारकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

