स्व. भास्कर गणपतराव देशमाने यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – भास्कर देशमाने यांनी कष्टातून आपले जीवन कार्य प्रगतीकडे नेत परिवाराला देखील तेवढेच प्रेम दिले. त्यांचे चिरंजीव स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांनी देखील सामाजिक कार्यात आपले नाव उंचावले असले तरी त्यांनी आई-वडिलांची सेवा केली. आई-वडिलांचे आशिर्वादाशिवाय आपली प्रगती नाही, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी केले.

धांदरफळ बुद्रुक येथे स्व. भास्कर देशमाने यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्योजक भाऊसाहेब डेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अशोक देशमुख, दिलीपराव शिंदे, माधवराव कानवडे आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, देशमाने मामा व त्यांच्या परिवाराने कष्टातून आपले जीवन घडविले. त्यांनी सदैव आपल्या शेतीशी, मातीशी आणि गावाशी बांधिलकी ठेवत समाजकार्यात मदतीला धावून जाण्याची व धार्मिक कार्याला सदैव मदत करण्याची शिकवण दिली यामुळेच आज बाळासाहेब देशमाने यांच्यासारखा व्यक्ती आज समाजाला अनेक ठिकाणी, अनेक सामाजिक कार्यात मदत करून नाव पुढे घेऊन जात आहे. हे सगळं करत असताना आपले प्रारब्ध प्रयत्न आणि नशिबाची साथ याबरोबर आई-वडिलांचा आशीर्वाद आणि भाग्याचाही साथ खूप महत्त्वाची आहे.

सदैव आपल्या आयुष्यामध्ये चांगली साथ आणि सोबत ठेवली तर आयुष्यामध्ये कोणापुढे हात पसरावे लागत नाही. बाळासाहेब देशमाने यांनी आपल्या वडिलांचे कष्ट लक्षात ठेवून देशमाने परिवाराला पुढे घेऊन जाताना समाजालाही प्रगतीचा उन्नतीचा मार्ग दाखवला. त्यांनी आपल्या सोबत असलेला प्रत्येक व्यक्तीला जगण्याचे सामर्थ्य आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची दिशा दिली.
उद्योजक भाऊसाहेब डेरे म्हणाले, आई-वडिलांचे कष्ट बाळासाहेब आणि मी कधी विसरणार नाही. आयुष्यात जगण्याची ऊर्जा आणि समाजाप्रती सेवा हीच आमच्या वडिलांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. बाळासाहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करताना सदैव आपल्या माय भूमीला दातृत्वाचे नेतृत्वाची भूमी म्हटलं आहे आणि ह्याच भूमीने येणाऱ्या प्रत्येक संकटात आम्हाला सदैव कार्यशक्तीची ऊर्जा दिली, हे आमच्या यशाचे गमक आहे.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, देशमाने परिवाराच्या मागील पिढीने उत्तम आर्थिक नियोजन केले. कष्ट केले. आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचं काम बाळासाहेब देशमाने यांच्या प्रयत्नाने झाले यामुळेच आज वडिलांच्या सेवेला व कार्याला सदैव स्मरणात राहण्यासाठी त्यांनी मायभूमीशी आपले नाते सदैव ठेवले. विविध सामाजिक कामातून, वृक्षारोपण, आरोग्य कॅम्प, रक्तदान शिबिर, शिक्षण, उद्योग, व्यापार, समाजरुपी कार्यातून देशमाने परिवार आज यशवंत होऊन आदर्श निर्माण करीत आहे.
रामहरी कातोरे म्हणाले, देशमाने कुटुंबातील कष्टकरी देव माणूस म्हणून शांत संयमी दादांचा स्वभाव होता. यातूनच दादांनी धांदरफळ गावाला व महाराष्ट्राला चांगला उद्योजक घडवला. कष्टातून व प्रामाणिकपणे आपल्याला यश मिळू शकते याचा मूर्तीमंत उदाहरण आज देशमाने परिवार आहे.
अशोक देशमुख म्हणाले, समाजाप्रती केलेल्या चांगल्या देणगी दान सेवा रूपाने आज दादांच्या स्मृती विविध सामाजिक विकासकामाने देशमाने परिवार या परिसराला आर्थिक मदत देऊन स्वर्गीय मामांच्या आठवणीचा सेवा कुंभ उभारत आहे.
दिलीपराव शिंदे म्हणाले, आजची पिढी खऱ्या अर्थाने घरातील वडीलधाऱ्या मंडळींना सन्माननीय वागणूक देत नाही परंतु दादांचे संस्कार आज बाळासाहेब देशमाने यांच्यावर झाले. धार्मिक कार्यामध्ये पुढे येऊन मदतीचा हात देणारा, साथ करणारा सुपुत्र या संगमनेर तालुक्याला लाभला.
माधवराव कानवडे म्हणाले, आई-वडिलांच्या पूर्वीच्या कष्टाचे स्मरण आणि समाजाची केलेले सेवा ही कधीही आपला आयुष्यात कुठलीच गोष्ट कमी पडू देत नाही. संकटामध्ये जे उभे राहून आपल्याला यशस्वीतेपर्यंत नेण्याचं काम आपण केलेले कष्ट समाजा प्रति रुपी असलेले सेवाभाव आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवतो.
यावेळी परिसरातील अनेक नामवंत हरिभक्त परायण कीर्तनकार महाराज भजनी मंडळ वारकरी टाळकरी मंडळ विविध संस्थांचे पदाधिकारी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर मंडळी नातेवाईक मित्रपरिवार ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केले तर पसायदान रुपी सेवा हरिभक्त परायण सुनील महाराज मंगळापुरकर यांनी केली.
देशमाने (दादा) यांच्या आठवणी त्यांच्या कार्याच्या रूपाने या समाजाला व गावाला आठवणीत राहण्यासाठी देशमाने परिवाराने विविध सामाजिक कार्यासाठी १७ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिली आहे. याबरोबरच स्व. कुशबा रावजी डेरे, उद्योजक भाऊसाहेब डेरे व स्व. भास्करराव देशमाने यांच्या स्मरणार्थ गाव पंचक्रोशीला वैकुंठ रथाचे लोकार्पण केले. ही सेवा खऱ्या अर्थाने सदैव दादांच्या समाजकार्याची आठवण देणारी राहील.

