महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – एरव्ही त्याच्या दहशती आणि जीवघेण्या कृत्याबद्दल सर्वच ऐकून होते. शुक्रवारच्या सकाळीच त्याने नासिक-पुणे महामार्ग ओलांडत मालपाणी लॉन्समध्ये प्रवेश केला. थोडा वेळ तेथे रेंगाळल्यानंतर त्याने भिंतीवरून उडी घेत थेट मागच्या बाजूला असलेल्या पद्मनगर तेथून जवळच्याच आदर्श कॉलनीमध्ये प्रवेश केला. थांबण्यासाठी तेथे त्याला पत्र्याचे शेड दिसली आणि त्याने तेथेच काही काळ मुक्काम ठोकला. परिसरासह आसपास असलेल्या नागरिकांचे भीतीने गाळण उडाली आणि बघता बघता ही वार्ता शहरात पसरली.
शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास नाशिक पुणे हायवेलगत असलेल्या मालपाणी लॉन्स मध्ये एका बिबट्याने प्रवेश केला होता. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने लगेचच तेथील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यामुळे काही काळ येथे मुक्काम ठोकलेल्या बिबट्याला येथे निर्माण झालेल्या गोंधळामुळे तेथून बाहेर पडावे लागले. याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले.

बिबट्याने तेथून धूम ठोकत मागच्या बाजूला असलेल्या पद्मनगर जवळून पुढे शेतीचा परिसर असलेल्या मालदाड रस्त्याकडे कूच केली. तेथून जवळच असलेल्या आदर्श कॉलनीमध्ये एका घरालगत पत्र्याचे शेड दिसल्याने या शेडमध्ये त्याने आपला मुक्काम ठोकला. बिबट्या आल्याची वार्ता शहरभर पसरल्याने या परिसरात नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
वनविभागाला आणि पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील गर्दीला नियंत्रित करत वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी आपले रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. बिबट्यावर तीनदा भूल प्रयोग करण्यात आला. बिबट्या बेशुद्ध झाल्याची खात्री पटतात वनविभागाने त्याला ताब्यात घेत पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.

