महाराष्ट्र संवाद न्यूज
जिथे आपण सर्वजण एकत्र राहतो, एकमेकांना आधार देतो, सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी तर समाधानी असावी. आनंद हा भौतिक पातळीवर असतो आणि समाधान आत्मिक पातळीवर असते.
साखर, लिंबू, मीठ हे सारे पदार्थ आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात, तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते तर मीठ व साखरेला पाण्यात विरघळून एकजीव व्हावे लागते. म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत. कारण गृहमंदिरात जर पती-पत्नी मनाने एकरूप झाले, तर चवदार सरबत नाही तर मधुर-अमृत तयार होईल.
आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो. अन्यथ: ती मनातल्या मनात कुढत राहतात. मुले ही अनुकरणप्रिय असतात. आईचा कडवट चेहरा, वडिलांचा आरडा-ओरडा घराचा अक्षरशः उकिरडा करतो. आणि मग वास्तुतज्ज्ञ या समस्येच्या मुळाशी न जाताच फक्त अतार्किक, अशास्त्रीय आणि बिनबुडाचे उपाय सुचवितो आणि आपण निर्बुद्ध मंडळी त्यावर हजारो रुपये खर्च करुन पस्तावतो.

अरे, बाबांनो कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर पैसे घेऊन तुमच्या घरात “शांती” आणणे शक्य आहे का.?!!! तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता.
ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृती साथ देत असेल तर, अर्थार्जन करून मुलांना हातभार लावावा. रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे. काहीही कारण नसताना सारखे लोळत पडलेली माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात.
मुलांनीही जन्मभर कष्ट केलेल्या आई-वडिलांशी खूप नम्रतेने वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये. सून म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला खूप प्रेम आणि आधार द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली आधुनिक मुलगी आहे. आपणच जनरेशन गॅप कमी करावा. अर्थात सुनेने सुद्धा सासरी साऱ्यांना असा लळा लावावा, की सून माहेरी गेली की सुनं-सुनं वाटलं पाहिजे.
घरात मेणबत्या फुंकून आणि डोक्यावर कचरा पाडून घेऊन वाढदिवसाचा धांगडधिंगा करण्यापेक्षा मुलाचे निरांजन ओवाळून औक्षण करावे. भोजनाचे वेळी आनंदी वातावरण ठेवावे. पत्नी जेवली का? याची विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप संयमाने बोलावे. एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्यात. एकजण चिडला तर दुसऱ्याने शांत बसावे.
पहा ना, गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो, तसे सारे शांत होईल. चालतानाही घरात पाय आपटू नयेत. शांतपणे वस्तू हाताळाव्यात.उगीचच भांड्यांची आदळ-आपट करु नये. पुरुषांनीही घरात नीटनेटके रहावे. सतत फक्त बायकांनीच सदाफुलीसारखे टवटवीत राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही.
दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.
आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नको त्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, लोकांपासुन दूर रहा, अफवावर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.
संकलक,
प्रा. माधव सावळे
(साभार समाज माध्यम)

