महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी (ता. २८ डिसेंबर) नागपूरमध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा १३८ वा स्थापनादिन साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामधून बुधवारी दुपारी १० हजारावर काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी नागपूरला जाणार आहे.
मंगळवारी संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे यासाठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव धीरज गुजर, योगेंद्र बंटी पाटील, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, करण ससाने, हेमंत ओगले, नगर शहराध्यक्ष किरण काळे, ज्ञानदेव वाफारे, बाबासाहेब दिघे, सचिन गुजर, हिरालाल पगडाल, गणपतराव सांगळे, सुरेश थोरात, संतोष हासे, मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

धीरज गुजर म्हणाले, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्याची वाटचाल अतिशय चांगली आहे. ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते असलेले विखे यांनी पक्ष सोडला. त्या परिस्थितीत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळली. काँग्रेस पक्षाला सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणून ठेवले. तसेच ४४ आमदारही निवडून आणले. म्हणून अडचणीच्या काळात ज्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली अशाच नेत्यांना जनता कायम लक्षात ठेवते.
आमदार कानडे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातून १० हजार कार्यकर्ते नागपूरला रवाना होत आहे. नगर जिल्ह्यामध्ये आमदार थोरात यांनी कायमच पक्षाला बळ देण्याचे काम केले. पुढील काळामध्ये महाविकास आघाडीला चांगले दिवस येणार आहे.
राजेद्र नागवडे म्हणाले, नागपूरला जाण्यासाठी नगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागपूरला जाणार आहे. जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेससाठी अतिशय चांगले वातावरण असून प्रत्येक तालुकाध्यक्षांनी मोठ्या ताकतीने कामाला लागावे.
यावेळी शहराध्यक्ष किरण काळे, हेमंत ओगले, करण ससाणे, राजेंद्र वाघमारे, शिवाजी नेहे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ज्ञानदेव वाफारे यांनी केले.

