महाराष्ट्र संवाद न्यूज
नवी दिल्ली – काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. “भारत न्याय यात्रा” असं नाव या यात्रेला देण्यात आल असून १४ जानेवारीला मणिपूर पासून ही यात्रा सुरू होणार असल्याची घोषणा काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी केली.
खासदार गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी दक्षिण भारतातील कन्याकुमारीपासून उत्तर भारतातील काश्मीरपर्यंत काढलेली ही भारत जोडो यात्रा देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. या यात्रेचा दुसरा टप्पा लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू होईल अशी शक्यता होती. मात्र २२ जानेवारीला होत असलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अति भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता ही यात्रा १४ जानेवारीला मणिपूर पासून सुरू होणार आहे. यात्रेचा शेवट २८ मार्चला महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत होईल. त्यामुळे या यात्रेला राज्यात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भारत न्याय यात्रेच्या म्हणजेच भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व ते पश्चिम भाग सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मणिपूर मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रश्नावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. याच मणिपूरमधून आता गांधी यांच्या भारत न्याय यात्रेची सुरुवात होणार आहे.
लोकसभेच्या सर्वाधिक जागांमध्ये उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागत असल्याने मुंबईत यात्रेचा समारोप होईल. तर हीच बाब लक्षात घेत काँग्रेसच्या स्थापना दिनी गुरुवारी काँग्रेसने नागपूरमध्ये महासभेचे आयोजन केलं असून या सभेला ‘है तयार हम’ असं नाव देण्यात आला आहे या सभेच्या माध्यमातून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
एकीकडे मोदी सरकारने रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय केला असतांनाच काँग्रेसने मात्र महाराष्ट्रातून त्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

