महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी संगमनेर तालुक्यातील १९ हजार १९३ लाभार्थ्यांना डिसेंबर २०२३ अखेर १ कोटी ४८ लाख ६९ हजार ७०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झाल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.
राज्य शासनाच्या माध्यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंबलाभ योजना अशा योजनांचा यात समावेश आहे.

संगमनेर तालुक्यातील १९ हजार १९३ लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा वर्ग करण्याच्या सुचना प्रशासनास दिल्या होत्या. त्याप्रमाणे हे अनुदान वर्ग झाले आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत हे अनुदान वर्ग झाले असून यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ५२४० लाभार्थ्यांना ७७ लाख ७६ हजार रुपये, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुसूचित जातीच्या ५५९ लाभार्थ्याना ८ लाख ३१ हजार ३०० रुपये, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुसूचित जमातीच्या २२७ लाभार्थ्यांना ३ लाख ३७ हजार ५०० रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या सर्वसाधारण ५३७६ लाभार्थ्यांना ८० लाख ६४ हजार रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या ७०२ लाभार्थ्यांना १० लाख ५३ हजार रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती ३२५ लाभार्थ्यांना ४ लाख ८७ हजार ५०० रुपये व श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ४०७६ लाभार्थ्यांना ५२ लाख ६५ हजार २०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करणेत आले.
खताळ यांचे आवाहन….
संगमनेर तालुक्यात मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेबाबत शहरात व ग्रामीण भागात मेळावे घेऊन गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास कोणालाही पैसे देण्याची, मध्यस्थाची गरज नाही. लाभार्थी म्हणून मानधन मिळण्यास काही अडचण येत असल्यास माझ्याशी, मंत्री विखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी अथवा भाजप कार्यालयाशी संपर्क साधावा.

