पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. वृक्षलागवडीच्या माध्यमातून परिसरातील हिरवाई वाढविण्यासोबतच गावाचे सौंदर्य आणि पर्यावरण समृद्ध करण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
तालुक्यातील घारगाव येथील विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष गणेश धात्रक यांच्या मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घारगाव–शिदायकवाडी रस्त्यालगत शेत परिसरातील डोंगरावर आमदार खताळ यांच्या हस्ते वडासह करवंदाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी घारगावचे सरपंच नितीन आहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शैलेश फटांगरे, माजी उपसरपंच संदीप आहेर, सदस्य मंगेश कान्होरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आहेर, जगदीश धात्रक, दशरथ गाडेकर, सोमनाथ रोडे, लहू आभाळे, खंडू जाधव, अमित शेळके, राजेंद्र धात्रक, गणेश आभाळे, सचिन बोडके, पूजा सोनवणे, ललित कान्होरे, दिनेश भालेराव, राहुल धात्रक, वैभव धात्रक, मंगेश भुतांबरे, उत्तम काळे यांच्यासह शिवसेना महायुती कार्यकर्ते तसेच धात्रक परिवारातील सदस्य उपस्थित होते
खताळ म्हणाले, गणेश धात्रक यांनी वृक्षारोपण करण्याचा केलेला संकल्प अत्यंत कौतुकास्पद आहे. वाढदिवस, विविध समारंभ अथवा महत्त्वाच्या दिवसांचे औचित्य साधून केवळ शुभेच्छा देण्याऐवजी प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प केला पाहिजे. मात्र, झाड लावणे एवढेच महत्त्वाचे नसून त्याचे नियमित संगोपन करून ते मोठे होईपर्यंत त्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. वृक्षसंवर्धनासोबतच जलसंवर्धनाचीही जोड देणे काळाची गरज आहे.
झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होते. परिसरातील हिरवाई वाढण्यासोबतच पाऊस, माती आणि जलस्रोतांचे संवर्धन होण्यासही वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. विशेषतः तरुण पिढीने पुढाकार घेऊन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची ही चळवळ गावागावात पोहोचवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.