महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : प्रभू श्रीरामाबद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या संगमनेरमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहर पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे महापाप त्यांनी केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले.

भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्यासह वैभव लांडगे, संतोष गायकवाड, संतोष पठाडे, सिताराम भांगरे, हरीश वलवे, राहुल भोईर, केतन भांगरे, सुरेश दळवी आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत.
आव्हाडांकडून खेद व्यक्त…
दरम्यान प्रभू श्रीरामाबद्दलच्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या आव्हाड यांनी आपल्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी कुठल्याही भाष्य अभ्यासाशिवाय केलेले नाही. पण आजकाल अभ्यासाला नाहीतर भावनांना महत्त्व आहे. जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.

