थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त तालुक्यातील ज्येष्ठांचा सन्मान
महात्मा गांधींचा विचार हाच शाश्वत विचार : आमदार थोरात
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : काही विघातक शक्तींनी महात्मा गांधींना मारले असले तरी त्यांचे विचार कधीही मारता आले नाही. आजही जगभरातील ६०० विद्यापीठांमधून गांधी विचार शिकविला जातो. गांधी-नेहरू हा देशाच्या विकासाचा विचार आहे, तो कोणीही पुसू शकणार नसल्याचे स्पष्ट करत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे जीवनकार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहणार असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार विचारवंत मधुकर भावे यांनी काढले.
सहकार महर्षी थोरात कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे जयंती शताब्दी वर्षानिमित्त सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले. तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त तालुक्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व व जुन्या कार्यकर्त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी अनेकांना गहिवरून आले. आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, राजवर्धन थोरात, रणजीतसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, शरयूताई देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भावे म्हणाले, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे विचार व पक्षनिष्ठा जपून काम केले आहे. १९८५ पासून विधान मंडळात असताना एकही डाग या नेतृत्वावर पडला नाही. विचारावर उभा राहणारा माणूस कधीही अयशस्वी होत नाही. सर्वधर्म समभाव व पुरोगामी विचार जपणारे बाळासाहेब थोरात यांनी वडील भाऊसाहेब थोरात यांचे पांग फेडले असल्याचे ते म्हणाले.
आमदार थोरात म्हणाले, तालुक्याच्या विकासात स्वर्गीय भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज आपण आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरदचंद्रजी पवार यांनी तालुक्याच्या विकासाला वेळोवेळी साथ दिली. भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून तालुक्यात समृद्धी निर्माण केली. डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केंद्रात पंधरा वर्षे कृषी मंत्री पद अत्यंत सक्षमपणे सांभाळले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. इतका विश्वास नेहरूजींचा त्यांच्यावर होता. देशात हरितक्रांती निर्माण करण्यात डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा मोठा वाटा राहिला. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे कायम ऋण व्यक्त आपण केले आहे. तालुक्याच्या विकासात मागील पिढीने मोठे योगदान दिले. त्यांचा येथे सन्मान होत आहे. आज अनेक जण काळाच्या ओघात नाहीत. मात्र या सर्वांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली जात आहे.
राज्यघटना आणि गांधीजींचा विचार हाच शाश्वत राहणार असून आपल्या सर्वांना तो जपायचा आहे. अडचणी खूप आहेत. मात्र अडचणीत आपण लढतो याची इतिहास नोंद घेईल असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक डॉ. सुधीर तांबे यांनी, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाबा ओहोळ यांनी आभार मानले.

