महाराष्ट्र संवाद न्यूज – प्रत्येक कुटुंब आणि देशाच्या विकासात स्त्रियांचे मोठे महत्त्व आहे. ५० टक्के लोकसंख्या असलेल्या स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून महिला निरोगी असली तर कुटुंब निरोगी राहते. संगमनेर तालुका हा एक परिवार समजून आमदार थोरात यांनी प्रत्येक गाव-वाडी-वस्तीपर्यंत विकासाच्या योजना राबविल्या. त्यांच्याच अथक प्रयत्नातून साकारलेल्या निळवंडे धरण आणि कालव्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले.
कोळवाडे येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद व एकवीरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्त्री ग्रामसंघ भवन उद्घाटन व तिळगुळ वाटपप्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी संशोधक कॅन्सर तज्ञ डॉ. हसमुख जैन, गटविकास अधिकारी अनिल नागणे, माजी पंचायत समिती सदस्य काशिनाथ गोंधे, भाऊसाहेब नवले, सोपान वर्पे, पुष्पाताई गुंजाळ, बाबुराव गोंधे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, निलेश कोकाटे ,रवींद्र खलाटे, योगेश गुंजाळ, मंगेश वर्पे, शैला घोडे, कल्याणी कुदळ, अभिजीत गंभीरे, महेश पारधी, वनिता काटे, भाग्यश्री बांबळे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
थोरात म्हणाल्या, संगमनेर तालुका हा राज्यातील प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्याच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. तालुक्यातील महिला या खूप कष्टाळू आहेत. सकाळी लवकर उठण्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत शेतीची अनेक कामे त्या सांभाळतात. मात्र हे सर्व करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्त्रियांचे आरोग्य चांगले असेल तर कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. कॅन्सरबाबत वाढता प्रादुर्भाव हा अत्यंत चिंताजनक असून महिलांनी कोणतीही गाठ आली तर त्वरित आपल्या जवळच्या व्यक्ती किंवा डॉक्टरांना सांगितले पाहिजे.

कॅन्सरवर पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे मात करता येते. कोणतीही गाठ असेल किंवा आरोग्याबाबत कधीही मला संपर्क करा. संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आमदार थोरात यांनी अविरत काम केले असून सर्वात मोठ्या असलेल्या या तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी-वस्तीवर विकासाच्या योजना पोहोचविल्या आहेत. अनेक मोठमोठी विकास कामे मार्गी लावताना समृद्ध सहकार उभारला. सहकारामुळे संगमनेर तालुका हा देश पातळीवर ओळखला जातो.
दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण, कालवे आमदार थोरात यांनी पूर्ण केले असून या कालव्यांचे पाणी आता शेतात येत आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. एक तालुका एक परिवार ही संकल्पना आपल्या तालुक्याची असून प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात आमदार थोरात सहभागी होत असतात. सर्वधर्म समभाव व सर्वांना समान संधी असल्यामुळे संगमनेर तालुका हा सुसंस्कृत वैभवशाली व विकसित तालुका म्हणून ओळखला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याणी कुदळ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी, सूत्रसंचालन दिलीप बांबळे व अश्विनी गुंजाळ यांनी केले. मंगल कुदळ यांनी आभार मानले. यावेळी कोळवाडे व परिसरातील महिला नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गटविकास अधिकारी अनिल नागने म्हणाले, संगमनेर तालुक्यात उमेदच्या माध्यमातून अनेक बचत गटांची स्थापना झाली. यामधून महिला सक्षमीकरणाला मोठा वाव मिळाला. अनेक महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. यातून कुटुंबासाठी त्या हातभार लावत आहेत.

बचत गटांनी बनवलेल्या वस्तूंच्या बाजाराने गाव फुलले…
उमेद व जयहिंदच्या माध्यमातून कोळवाडे व परिसरात सुमारे ६० बचत गट कार्यरत असून या बचत गटांच्या महिलांनी बनवलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते. यामुळे २६ जानेवारीच्या दिवशी कोळवाडे गाव बाजारासारखे फुलून गेले. अनेक परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी येऊन मोठी खरेदी विक्री केल्याने बचत गटांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाली.

