महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – मुंबई दाऊद, छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन ही मंडळी खंडणी, जमीन बळकावत दहशत निर्माण करत होते, परंतु शिवसेना त्यांच्या विरोधात उभी राहिली. तुम्ही गुंड तर आम्हीही महागुंड असे म्हणत रस्त्यावर उतरून विरोध केल्याने ते पळून गेले. आता माझ्याकडे नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरीविरोधात अनेकांच्या फाईल्स आल्या. राज्यात नवे सरकार आल्यापासून त्यांचे गुंडाराज वाढले आहे. नगरमधील या गुंडगिरी व ताबेमारीविरुद्ध छापामारी कशी करायची हे शिवसेनेला माहित आहे. सरकारने ताबामारी थांबविली नाही तर अहमदनगरच्या रस्त्यावर तमाशा होईल. या आमदाराच्या घरावर व जिल्हा प्रशासनावर माझ्या नेतृत्वाखाली मी महाविकास आघाडीचा मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिला.
नगरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानिमित्ताने राऊत नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, माजी आमदार विजय औटी, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसुंदर, उपनेते साजन पाचपुते, योगीराज गाडे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. राऊत म्हणाले, नगरचे माजी आमदार अनिल भैया राठोड यांनी गुंडगिरी व झुंडशाही विरोधात टक्कर दिली. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना पोरकेपणा जाणवत आहे. मात्र भैय्यांचा विधानसभेत पराभव का व कसा घडवला गेला हे आम्हाला माहित आहे. एकीकडे राम राम म्हणत मार्केटिंग करायचे व दुसरीकडे देवस्थान व शैक्षणिक संस्थांच्या जमिनी, भूखंड, शिवसेना नगरसेवकांची कामे लुटली जात आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. व्यापार करणे त्यांना मुश्किल झाले आहे. शहर सोडण्याची भाषा ते करीत आहेत.

नगरचे आमदार महाविकास आघाडी सोबत होते आता मात्र ते राज्यातील नव्या सरकार सोबत आहेत. नव्या सरकारच्या पाठबळामुळे ते नगरमध्ये गुंडगिरी व ताबेमारी करीत आहेत. नगरमधील गुन्हेगारीवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे त्यांचा बॉस कोण आहे हे स्पष्ट होऊ द्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री त्यांचे पोशिंदे तर नाहीत ना असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित करीत नगरमधील ताबेमारी थांबली नाही तर या विरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरेल. मुंबईतील गुंडगिरी विरुद्ध जसा संघर्ष केला तसाच नगरमध्ये केला जाईल. असे देखील ते म्हणाले.
२०१४ पूर्वी महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य होते मात्र भाजपने राज्यात द्वेष व आकस वाढविला. राजकीय विरोधकाला शत्रू मानून त्याला कुटुंबासह संपवण्याचे घातक राजकारण दिल्लीतील भाजपाचे नेते करीत आहे. द्वेष, सूड, बदला असे प्रकार गेल्या दहा वर्षात वाढले असून राज्याच्या सुसंस्कृत संस्कृतीला भाजपने काळे फासले असल्याचे राऊत यांनी सांगितले.
अयोध्येत राम तर बिहारमध्ये पलटूराम..
नितेश कुमार यांचे मानसिक स्वास्थ ठीक नाही ते आमच्यापासून दूर गेल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. त्यांनी राजीनामा दिला, राजीनामा देणे हा नितेश कुमार यांचा छंद आहे. अयोध्येत राम आहे तर बिहारमध्ये पलटूराम आहे. सगळ्यात मोठे पलटूराम भाजप आहे, असे देखील राऊत म्हणाले.

