महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील १२८ लाभार्थ्यांना ९ लाख ८३ हजार रुपयांचे साहित्य महसूल तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.
या साहित्यामध्ये कडबा कुट्टी, पीठ गिरणी, लेडीज सायकलींचा समावेश आहे. सरकारच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी ग्रामीण भागातील गरजवंतांना योजनेचा लाभ व्हावा, यासाठी मंत्री विखे यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टीच्यावतीने काम सुरु आहे.

पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यकाल संपलेला असल्यामुळे समाजकल्याण विभागाच्यावतीने सुरु असलेल्या योजनेचा लाभ मिळतो की नाही, अशी शंका काहींनी व्यक्त केली होती. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ग्रामीण भागात गावागावात या योजनेसाठी पात्र असलेल्यांशी संपर्क साधून प्रकरणे समाज कल्याण विभागात जमा करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
संगमनेर तालुक्यात मंत्री विखेंच्या माध्यमातून यासाठी करोडो रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी मिळत आहे. त्या माध्यमातून अनेक वर्ष प्रलंबित असलेले अनेक विषय मार्गी लागत असल्याचे समाधान नागरिक व्यक्त करत आहे.
विखे यांच्या सूचनेनुसार नुकतेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी संगमनेर तालुक्यासाठी १८ कडबा कुट्टीसाठी ४ लाख ६८ हजार रुपये, १८ पिठ गिरणीसाठी २३ हजार ४०० रुपये, शालेय मुलींसाठी ८२ लेडीज सायकलसाठी ४ लाख ९२ हजार रुपये मंजूर केले असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोक हितकारी योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन अमोल खताळ यांनी केले.

