महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – ज्यामध्ये विविध स्वरूपाची विविधता आहे. त्या विविधतेमध्ये देखील एकात्मता साधली गेली आहेत. रंग, वर्ण, भाषा, आचरण पद्धती यावरून भारतीय संस्कृती कोणाला विभागत नाही. देशात हजारो वर्षांपासून लोकशाही अस्तित्वात आहे. पूर्वी येथे राजाही लोकांमधून निवडला जायचा. लोकशाही या भूमीला नवीन नाही, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी व्यक्त केले.
चाणक्य मंडल परिवारातर्फे संगमनेर येथील गटविकास अधिकारी अनिल नागणे यांचे “प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास” व भूषण केळकर संपादित ‘यशोगाथा’ या पुस्तकांचे प्रकाशन खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूर्णा धर्माधिकारी, अनिल नागणे, भूषण केळकर, उपस्थित होते. माजी आयएएस अधिकारी व संचालक अविनाश धर्माधिकारी अध्यक्षस्थानी होते.
खान म्हणाले, ‘विविध वर्ण, भाषा, आचरण पद्धती आणि परंपरा यांच्या मिलाफातून हजारो वर्षांपूर्वी भारतीय संस्कृती विकसित झाली आहे. मी कोणती भाषा बोलतो, आपला रंग कोणता यावरून आपली संस्कृती ठरत नाही. जगाच्या पाठीवर लोकशाही असणाऱ्या देशांनी महिलांना मताचा अधिकार दिला नाही. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळताच देशातील सर्वांना मताचा समान अधिकार मिळाला. भारतीय संस्कृती दुसऱ्यावर आक्रमण करण्याची परवानगी देत नाही हे ही लक्षात घ्यायला हव.
मी गोरा आहे म्हणून श्रेष्ठ आहे, असा भाव निर्माण झाला, तर बाकीचे दुसऱ्या गटात मोडले जातात. अशा वर्गवारीतून समाजाबद्दल भीती आणि द्वेष निर्माण होतो त्यातून हिंसा निर्माण होते. द्वेषातून मुक्तता मिळाली, तर मानवाला धर्माची गरज उरणार नाही.
चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी प्रशासनासहित जीवनाच्या विविध क्षेत्रांत उत्तमता आणि प्रतिभेचा ध्यास घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
शशांक देवगडकर, प्रसन्न दातार, धनंजय कदम, हृषिकेश उत्पात, नेहा देसाई असे चाणक्य मंडलचे विद्यार्थी आणि सध्या प्रशासनात कार्यरत असलेले अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. अँड. सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले.

सर्वांसाठीच उपयोगी पुस्तक!
प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास हे पुस्तक विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांतील विद्यार्थ्यांसाठी निश्चित स्वरूपात उपयोगी आहे. अत्यंत सुलभ व विविध संदर्भ यांचा उपयोग करून हे पुस्तक वाचकांच्या हाती देण्यात आले आहेत. स्पर्धा परीक्षेच्या पलीकडेही या कालखंडाचा अभ्यास करू पाहणाऱ्या अभ्यासकांना देखील या पुस्तकातील संदर्भ आणि लेखन उपयोगी पडणार आहे. इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या नाहीत तर त्या काळातही अनेक परिवर्तनाच्या वाटा निर्माण करण्यात आल्या आहेत. समाज बदलत असतो त्या बदलणाऱ्या प्रवाहाचे दर्शनही त्या त्या काळात वाचकांना घडण्यास यामुळे मदत होणार आहे.
अनिल नागणे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती संगमनेर

