महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – पहिल्याच दिवशी तब्बल पन्नास हजारावर नागरिकांची उपस्थिती आणि नागरिकांच्या गर्दीने फुललेल्या जाणता राजा मैदानावर संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहासाचा अविस्मरणीय थरार “शिवपुत्र संभाजी” महानाट्याच्या रूपाने रविवारी संध्याकाळी संगमनेरकरांना अनुभवण्यास मिळाला.

निमित्त होते लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे. बुधवारी ७ फेब्रुवारीला थोरात यांचा वाढदिवस. या निमित्ताने ४ ते ७ फेब्रुवारी या चार दिवसां दरम्यान जाणता राजा मैदानावर खासदार अमोल कोल्हे यांचे प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी अपेक्षा अधिक गर्दी झाल्याने अनेकांनी तब्बल चार तासाहून अधिक वेळ उभे राहून महानाट्याचा थरार अनुभवला तर मैदानावर जागाच शिल्लक नसल्याने अनेक नागरिकांना माघारी फिरावे लागले. पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता उर्वरित तीनही दिवस या महानाट्याला संगमनेरकरांची पसंती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.
संभाजी राजांच्या प्रमुख भूमिकेत असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाळासाहेब थोरात, कांचनताई थोरात, उद्योगपती राजेश मालपाणी, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अत्यंत आकर्षक सजावट, उत्कृष्ट बैठक व्यवस्था, भव्य पार्किंग आणि ५० हजारावर नागरिकांच्या उपस्थितीत शाहिरी डफाने व आतिषबाजीने चार दिवस चालणाऱ्या महानाट्याला सुरुवात झाली.
शंभू राजांचा जन्मोत्सव, आग्र्यामधून बाल शंभूराजांची सुटका, दिलेरखानाला दिलेले आव्हान हे सर्व प्रसंग अंगावर शहारे आणत होते.. सुमारे अडीचशे कलावंतांच्या उपस्थितीत भव्यदिव्य स्टेज जणू रायगडाची जाणीव करून देत होते. अशातच सह्याद्रीच्या छावा शिवपुत्र संभाजी महाराजांची रुबाबदार घोड्यावरून प्रेक्षकांमधून दिमाखदार एन्ट्री झाली. डॉ. अमोल कोल्हे यांचे आगमन होतात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
महानाट्यातील वाक्य न वाक्य अंगावर शहारे आणत होतं. मराठ्यांच्या तेजस्वी आणि धगधगत्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या महानाट्याने अनेकदा सर्वांच्या डोळ्यात अश्रू आनले. अभिनेते महेश कोकाटे यांनी साकारलेल्या अनाजी पंतांनी प्रचंड चिड आणली. तर अभिनेत्री स्नेहलता वसईकरणे साकारलेल्या येसूबाईची भूमिका संस्मरणीय ठरली.
समुद्रावरील जंजिरा मोहीम, बुऱ्हानपूर हल्ला, मोगली फौजांचे महाराष्ट्रावर आक्रमण, कडवट औरंगजेब बादशहा, त्यांचे संवाद हे सर्व अद्भुत होते. संभाजी राजांसोबत झालेली फितुरी, अटक, त्यानंतर मराठी मातीसाठी झालेले त्यांचे हाल आणि त्यांचा मृत्यू यामुळे प्रत्येक जण जसा गहिवरला तसेच या छाव्याबद्दल प्रत्येकाची छातीही अभिमानाने भरून आली. संगमनेरच्या दोनशे कलाकारांचा सहभाग हाही यात उल्लेखनीय ठरला.
संगमनेर तालुका हा विकासातून सर्व क्षेत्रात राज्यात पुढे – आमदार थोरात
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांचा इतिहास या महानाट्याद्वारे जिवंत केला आहे. सर्व संगमनेरकरांसाठी ही मोठी आनंद पर्वणी आहे. सहकार, शिक्षण, सर्व सुख सुविधा, पाणी, सुसंस्कृत वातावरण, सर्वधर्मसमभाव, सर्वांना समान संधी यामुळे संगमनेर तालुका हा विकासातून राज्यात सर्वात पुढे आहे. याचबरोबर या दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले असून डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा आनंद निर्माण झाला आहे. संगमनेर तालुका हा एक परिवार असून भक्कम कार्यकर्त्यांची फळी नागरिकांची साथ यामुळे ही विकासाची घोडदौड आपण सर्व मिळून अशीच पुढे नेऊ या, असे आवाहनही त्यांनी करताच उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.






