संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला संगमनेरकर नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून सलग तिसऱ्या दिवशी ६५ हजारावर नागरिकांची महानाट्याला गर्दी झाली होती.

जाणता राजा मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या महानाट्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्योगपती मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास सांगणारे धगधगते महानाट्य शिवपुत्र संभाजी संगमनेरमध्ये होत असून दररोज पन्नास हजारांच्या पुढे नागरिकांची या महानाट्याला उपस्थिती लाभत आहे. आलेल्या सर्व नागरिकांची चांगली बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, आकर्षक सजावट विद्युत रोषणाई आणि डोळे दिपवणारी उपस्थिती यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरत आहे.

स्वराज्य हे महाराष्ट्रातील अठरापगड समाजाचे आहे, समतेचा, एकीचा, बंधू भावाचा हा विचार स्वराज्याचा आणि महाराष्ट्राचा आहे. त्या काळातही अनाजीपंतरुपी लोकांनी तेढ निर्माण केले. तसेच विद्यमान काळातही अशा काही शक्ती समाजा-समाजात तेढ निर्माण करत आहेत. म्हणून अशा शक्तींना वेळीच रोखून समतेचा महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा मूलमंत्र लाखो नागरिकांनी या महानाट्यातून घेतला.
शिवपुत्र संभाजी यांचे अश्वावरून नागरिकांमधून आगमन होताच जाणता राजा मैदानावर होणारा जल्लोष हा संस्मरणीय ठरत आहे. संभाजी महाराजांच्या भूमिकेतील डॉ. अमोल कोल्हे यांचे संवाद आणि त्यांचा आवेशपूर्ण अभिनय पाहताना प्रत्येकाला प्रत्यक्षातील संभाजी राजांचा बाणेदारपणा आणि लढाऊ वृत्ती दिसून येते.
याचबरोबर सोयराबाईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री स्नेहलता वसईकरणे भूमिकेला दिलेला योग्य न्याय आणि कटकारस्थान रचणारे अनाजी पंताची भूमिका करणारे महेश कोकाटे यांचा अभिनय वाखाण्याजोगा आहे. स्थानिक कलाकारांसह सुमारे अडीचशे कलाकारांच्या संचात साजरे होणारे हे महानाट्य प्रत्येकासाठी एक अनमोल ठेवा ठरत आहे. यावेळी कलर्स मराठी वरील पिरतीचा जीव तुझ्यात गुंतला या मालिकेतील कलाकारांनी ही या नाटकासाठी उपस्थिती दर्शवली.
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. सर्व धर्म समभावाचा आहे. आपल्याला हा विचार पुढे न्यायचा आहे. संगमनेर तालुका हा विकासातून प्रगती करतो आहे. मोठ्या कष्टातून तालुक्यात आर्थिक संपन्नता निर्माण झाली आहे. निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला आहे. त्यातून तालुक्यात पाणी आल्याने स्वप्नपूर्ती झाली आहे. या चांगल्या कामांमध्ये व तालुक्याच्या विकासात काही लोक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एक तालुका एक परिवार आपला आहे. अडथळे निर्माण करणाऱ्याचा तालुक्यातील जनता वेळीच पायबंद करेल. – आमदार बाळासाहेब थोरात.

