पुणे – भाजपाच्या विचारांच्या विरोधात कोणी भूमिका घेत असेल तर सत्तेचा दुरुपयोग करून कारवाई केली जात आहे. यापूर्वी लोकांना फारसा माहिती नसलेला ईडी हा शब्द आता भाजप सरकारच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. गेल्या काही वर्षात ईडीने ६ हजार गुन्ह्यांची नोंद केली चौकशीअंती यात सत्यावर आधारित केवळ २५ खटले निघाले. त्यापैकी अवघ्या दोघांना शिक्षा झाली. या गुन्ह्यांच्या तपासासाठी ईडीने ४०४ कोटी रुपये खर्च केले. याशिवाय जे आज पक्ष सोडून विकासासाठी भाजपसोबत गेले असे सांगत आहेत, त्यात तथ्य नसून काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यानंतर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असं म्हणणं चूक असल्याचं सांगत आज शरद पवारांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर टीका करतानाच ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईची आकडेवारी सादर केली.
भाजपा सत्तेत आल्यानंतर १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे सरकार असणाऱ्या राज्यातील १४ मंत्री,२४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार यांचा समावेश आहे. मात्र यात एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचे नाव नसल्याचे सांगत भाजपच्या नेत्यांविरोधातील चौकशी थांबविण्यात आली, याचा नेमका अर्थ काय काढायचा? असा सवालही पवारांनी उपस्थित केला.

ईडी कोणाच्या मागे लागली, याकडेही पाहिले पाहिजे. गेल्या काही वर्षात अनेक नेत्यांच्या चौकशी झाल्या यापैकी ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत. भाजपने ईडीचा हत्यारासारखा वापर केला.
आज आपण वेगळ्या स्थितीतून जात आहोत. केंद्रातील सत्ता एका पक्षाच्या हातात आहे. उत्तरेकडील राज्यांचीही सत्ता भाजपाच्या हातात आहे. त्यांची धोरण सामाजिक ऐक्याला धक्का पोहोचविणारी आहेत.
काल लोकसभेचे अधिवेशन संपलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विधायक काहीही न सांगता केवळ नेहरू-गांधी यांच्यावरच भाष्य केलं. नेहरूंनी लोकशाही रुजविले. लोकशाहीचे शासन दिलं, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले मोदी करत आहेत. यातून काय साध्य होणार असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


