संगमनेर – अहोरात्र काबाडकष्ट करणारी आई, जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी बाप आणि आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे शिक्षक हेच आपल्या जीवनातील आदर्श असावे. त्यांना आदर्शस्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील ध्येय व स्वप्न साकार करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त सुनील कडलग यांनी केले.
श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात कडलग बोलत होते. स्कूल कमिटीचे चेअरमन शिवाजीराव खुळे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य श्रीकांत माघाडे, अशोकराव दिघे, बाबासाहेब वामन, बबन दिघे, विजय वामन, रंगनाथ खुळे, राम दिघे, चांगदेव वामन, खुळे सर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कडलग यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
कडलग म्हणाले, आजची पिढी इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युबचे रील्स आणि व्हाट्सअपच्या मागे धावत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी जिवलग मावळ्यांच्या आधारे या महाराष्ट्राला अन्याय, अत्याचार आणि मुघलांच्या अनन्वित अत्याचारापासून मुक्त केले, असे उद्दात्त ध्येय विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनासमोर ठेवले पाहिजे.

आपली परिस्थिती जेवढी प्रतिकूल आहे तेवढेच यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण प्रवाहाविरुद्ध पोहणारेच जीवनात यशस्वी होतात. आई-वडील आणि शिक्षक यांचा जीवनादर्श समोर ठेवून कष्ट केल्यास यश दूर नाही. मात्र हे यश मिळाल्यानंतर आणि आपण सक्षम झाल्यानंतर ज्या शाळेने आणि शिक्षकांनी आपल्याला मोठे केले, ज्या आई-वडिलांनी आपल्याला घडविले त्यांना विसरू नये.
आपण जेव्हा सक्षम होऊ तेव्हा आपणही आपल्या शाळेचे देणे लागतो ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवली पाहिजे असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात प्राचार्य माघाडे यांनी शाळेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेत शालेय उपक्रमांंबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त केल्याचे सांगितले. विद्यालयाचा प्रत्येक वर्ग डिजिटल रूम करण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांसाठी मोठे सभागृह बांधण्याचे प्रस्तावित असून विद्यार्थ्याची स्पिकिंग गुणवत्ता वाढवण्याचे दृष्टीने स्पोकन इंग्लिश प्रकल्प, स्कॉलरशिप असे वेगवेगळे उपक्रम विद्यालयात चालू असल्याचे सांगितले.

सदुकर थोरात यांनी सूत्रसंचालन केले. हर्षद कोल्हे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक गुंजाळ, नानासाहेब कोल्हे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.


