मुंबई – गुरुवारी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या महत्त्वपूर्ण असलेल्या बैठकीला जे सात आमदार गैरहजर होते त्यांनी पक्षाला गैरहजर राहण्याचे कारण पत्राच्या माध्यमातून कळविले होते, अशी माहिती काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी (ता. १५ फेब्रुवारी) काँग्रेसची महत्त्वाची बैठक विधिमंडळात पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे 30 पेक्षा अधिक आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर थोरातांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होत असल्याच्या चर्चे संदर्भात थोरात म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. आम्हालाही प्रसार माध्यमांकडूनच याबद्दल माहीत मिळत आहे. तर आजची जी बैठक झाली त्यावेळी आमचे सर्व आमदार उपस्थित होते. जे आमदार आजच्या बैठकीत अनुपस्थित होते. ते कोणत्या कारणामुळे अनुपस्थित होते, याबाबतचे पत्र मला त्यांच्याकडून देण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला जे आमदार अनुपस्थित होते, ते माझ्या संमतीने गैरहजर राहिले होते.
आमचे सर्व आमदार पक्षासोबत आहेत, असे स्पष्टीकरण देखील थोरातांनी दिले. “मनोज जरांगे यांच्याकडे सरकारने गांभीर्याने पाहिलेच पाहिजे. त्यांना जी काही आश्वासने सरकारने दिली होती, त्यांची पूर्तता करण्यात ज्या अडचणी येत आहेत, त्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि त्यांनी स्वतः त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे”, असे त्यांनी सांगितले.
तर, सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉण्डबाबत घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे. कारण गुप्त पद्धतीने हे बॉण्ड करण्यात येत होते आणि एकाच राजकीय पक्षाला हे बॉण्ड जात होते.

- लोणावळ्यात होणार काँग्रेसचे चिंतन शिबिर
- पक्ष संदर्भातील विविध गोष्टींमुळे होणार चिंतन
काँग्रेस पक्षाने दोन दिवसाचे चिंतन शिबिर आयोजित केले आहे. लोणावळ्यात हे शिबिर होणार असून राज्यभरातील पदाधिकारी या शिबिराला येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने हे शिबिर महत्त्वाचे आहे. या शिबिराच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या चुकांबाबत चर्चा करण्यात येईल. त्याशिवाय पक्षाच्या संदर्भातील विविध गोष्टींवरही या चिंतन शिबिरात चर्चा करण्यात येणार आहे.

