संगमनेर, दि. २८
काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आदर्श सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांने यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीतही ८ लॉक मॅट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केल्याची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिली आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीमुळे यावर्षीचा हंगाम साखर कारखानदारीसाठी अडचणीचा आहे. अशा स्थितीतही थोरात साखर कारखान्यावर सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. या बळावरच कारखान्याने गाळपाचा हा टप्पा पार केला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह तेथे त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. याशिवाय विविध उपक्रम देखील राबविले जात आहे. सहकार महर्षी थोरात यांनी घालून दिलेल्या कडव्या शिस्तीच्या बळावर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आदर्श वाटचाल करत सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक व कामगारांच्या हिताचे निर्णय सातत्याने घेतले आहे. उच्चांकी भावासाठी कारखान्याचा नावलौकिक आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी कारखान्याचा सन्मान देखील झालेला आहे.
साडेपाच हजार मॅट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या कारखान्याने एका दिवसात विक्रमी ९१२० मॅट्रिक टन ऊस गाळप केले आहे. कार्यक्षमतेच्या विक्रमी हे १६५ टक्के उत्पादन मानले जाते.

