दि. ८ मार्च, संगमनेर
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना त्याचे उल्लंघन करत एका पिकअपमधून निर्दयतेने वाहतूक केली जात असलेली ३६ जिवंत वासरांची सुटका करत ही वासरे संगमनेर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अबूबकर इसाक शहा (रा. ममदापुर, ता. राहता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना कत्तलीच्या उद्देशाने एका पीकअप मधून जिवंत वासरांची निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एम एच १७ बी वाय ५३९९ या क्रमांकाच्या पिकअप मध्ये पोलिसांना ३६ वासरे निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. कारवाईत पोलिसांनी सुमारे ३६ हजार रुपये किमतीची वासरे व पिकअपसह दोन लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमने यांनी दिली आहे.

