दि. ११ मार्च, मुंबई
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. दुपारी दोन वाजता यात्रा नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्चला पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होत असून याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात १५ जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली असून यात्रेची सांगता मुंबईत होत आहे. ही यात्रा १५ राज्ये, १०० जिल्हे, ११० लोकसभा मतदारसंघातून ६७ दिवसांत ६७०० किमीचा प्रवास करत आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक’ या घोषवाक्यासह ही यात्रा मार्गक्रमण करत आहे.

मागील वर्षी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४००० किलोमीटरची पदयात्रा काढली होती. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. तसाच भारत जोडो न्याय यात्रेलाही प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पक्षाकडून भारत जोडो न्याय यात्रेत अडथळे आणण्याचा जाणीवपूर्क प्रयत्न केला पण यात्रा न डगमगता सुरुच राहिली.
भारत जोडो न्याय यात्रेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जय्यत तयारी केली असून मुंबईत राहुल गांधी व न्याय यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेला व शिवाजी पार्कवरील जाहीर सभेला प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना प़टोले, विधिमंडळाचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

