दि. १४ मार्च, संगमनेर
राज्य शासनाच्यावतीने राबविल्या जात असलेल्या यशवंत पंचायत राज विकास अभियानात संगमनेर पंचायत समितीने बाजी मारली असून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. याशिवाय पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी प्रदीप वर्पे यांनाही गुणवंत अधिकारी पुरस्कार देण्यात आला.
महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यावेळी उपस्थित होते. संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
योजनांची अंमलबजावणी करून राज्याच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून पंचायत राज्य संस्थेच्या कामगिरीनुसार त्यांना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता राज्यात प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कामात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत समितीसाठी राज्यस्तरीय व विभागीय स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली.
या अभियानांतर्गत २०२२-२०२३ मध्ये संगमनेर पंचायत समितीने केलेल्या कामाची दखल घेत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकारी प्रदीप वर्पे यांना देखील २०१९-२०२० मधील गुणवंत अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले.

हे सांघिक यश… अनिल नागणे
पंचायत समितीला सातत्याने विविध स्वरूपाचे पुरस्कार मिळत आहेत. या कामांमध्ये समितीच्या सर्व विभागांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांच्या यशवंत पंचायतराज अभियानाच्या निकषानुसार त्यांना ठरवून दिलेल्या उद्दिष्ट पूर्ततेबाबत प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात सांघिकरित्या केलेल्या कामगिरीमुळे हा पुरस्कार प्राप्त झाला.

