गुरुवार दि. २१ मार्च, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादात असलेल्या जोर्वे नाका पहाटेच्या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रिकेटची मॅच खेळून आपल्या जोर्वे गावाकडे परतणाऱ्या मुलांवर हल्ला करण्यात आला आहे. या मुलांना त्यांच्याकडील बॅटनेच बेदम मारहाण केल्याचा प्रकार पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदूर शिंगोटे (ता. सिन्नर, नाशिक) येथे सुरू असलेल्या क्रिकेटच्या मॅच संपवून काही मुले घराकडे परतत असताना तीन बत्ती चौक ते जोर्वे नाका परिसरात त्यांना अडवून मारहाण करण्यात आली. या संदर्भात साई महेश जाधव यांच्या तक्रारीवरून एका दुचाकी चालकासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादीसह जोर्वे येथील क्रिकेट खेळणारी मुले २० मार्चला नांदूर शिंगोटे येथे नाईट क्रिकेट मॅच खेळण्यासाठी गेले होते. क्रिकेट मॅच संपल्यानंतर हे सर्वजण आपल्या दुचाकीवरून गावाकडे परतत होते. मध्यरात्री बस स्थानकाकडून जोर्वे नाक्याकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी या तरुणांकडे बघत रागाने खुन्नस देण्याचा प्रयत्न केला. पुढे जोर्वे नाक्यावर पोहोचल्यानंतर या दोघांनी या मुलांच्या दुचाकीला आपली दुचाकी आडवी घातली.
एम. एच. १७ सीपी ६०२८ या दुचाकीवरील तरुणांनी त्यांना नारेबाजी कोणी केली, असे म्हणत शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली. पाठोपाठ त्यांच्यासह त्यांच्या मदतीसाठी तेथे आलेल्या आणखी काही जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील केली. तर एकाने त्यांच्याकडील क्रिकेट बॅट हिसकावून घेत या बॅटने मारहाण केली. त्यामुळे आरडाओरडा ऐकून जमलेल्या लोकांनी या सर्वांना पोलीस ठाण्यात आणले होते. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.


