ॲड. गोरक्ष कापकर
आज २३ मार्च, चार वर्षापूर्वी देशात पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊन, त्यानंतर देशात कोरोनाच्या महामारीने उद्भवलेली परिस्थिती ज्यांनी पाहिली आणि भोगली, ती त्यांच्या मरेपर्यंत स्मरणात राहील. खरं तर २०२० साल हे ‘माणूस आणि माणुसकी’ या दोन गोष्टी जगाला शिकवणारे वर्ष होते. अंतराळात जाऊन मंगळावर वस्ती करण्याच्या कल्पना करणारा माणूस, रस्त्या-रस्त्यावर अनवाणी पायाने अश्मयुगातील टोळ्यासारखा अदृश्य आजाराच्या भयाने जीव वाचवण्यासाठी पळू लागला होता. ना त्याच्या जवळ खायला होतं, ना जवळ पाणी प्यायला होतं. माणूस माणसाला परक्या माणसासारखा दूर लोटू लागला होता. एरव्ही समूहाने राहणारा माणूस उपाशीपोटी माणुसकीने अस्पृश्य समजून दूर लोटले म्हणून शहरातुन गावाच्या ओढीने आपल्या माणसाकडे निघाला होता, परंतू गावात राहणाऱ्या माणसाने आपल्याच गावकऱ्यांना रोखण्यासाठी काट्याचे फास रस्त्यावर टाकले होते. गाव, शिवा माणुसकी विसरून क्षीण होऊ लागल्या होत्या. तरीसुद्धा माणसाला मनात एकच इच्छा होती, ती जगण्याची.
एरव्ही माणसांनी खचाखच भरलेली शहर माणसाच्याच भीतीने ओस पडत चालली होती. सरकारपुढे अनामिक संकट उभे राहिल्याने बळजबरी करून लोकांना गावी जाण्यापासून मज्जाव करीत होती. माणसाचा माणसावर भरवसा उरला नव्हता. सरकारने दळणवळण व्यवस्था अचानक बंद केल्याने डोक्यावर बिऱ्हाड असणारे लाखो गरीब माणसे, कामगार, लहान मूल, महिला अनेक जण खाण्या-पिण्यावाचून तडफडत होती. अनेक जण अपघातात मरत होती.
शंभर वर्षापूर्वी “मानमोडी”ची साथ आली तेव्हा अशीच माणसं पळत होती, असे जुने जाणकार मंडळी सांगत होती. तेव्हा सुद्धा माणसं जवळच्या माणसांना दूर लोटून आपला जीव वाचवत पळत होती. माणूस आणि माणुसकी संपत चालली होती. डॉक्टर देव बनून उभे राहत होते. खरंतर या अदृश्य, अनियंत्रित आजारामुळे सुरुवातीला अनिश्चिततेचे सावट जगावर पसरलं होतं. काय करायचं आणि काय नाही, कुठून येतो कोरोनाचा जंतू, कसा येतो, यांबद्दल बातम्या ऐकुन समाज वेडा झाला होता. माणसांना कळत नव्हतं, मरण सोपे झालं होतं.
एरव्ही प्रेताच्या गळ्यात पडून रडणारी माणसं आपल्याच माणसांना झालेल्या अदृश्य आजाराच्या भीतीने जंगलात, रस्त्यावर सोडून पळत होती. रक्ताची माणसं तरफडून मरत असताना त्याच्या घरातील माणस त्याला वाऱ्यावर सोडून पळू लागली होती. अंत्यविधी करण्याचे कामसुद्धा सरकारवर सोडून मोकळी झाली होती. सेवा करण्याचे सोंग करून गरीबांच्या जीवावर मोठे झालेले राजकारणी आणि समाजकारणी फोन बंद करून गायब होताना दिसले. गल्लीत बंद केला म्हणून त्याला मोठा विरोध करणारे अनेक तथाकथित नेते आता जग बंद झाले तरी गप्पच होते.
खर तर गरीब-श्रीमंतीची रेषा कधीच पुसून गेली होती, आणि अनेक देशात नोटा रस्त्यावर फेकण्याचा प्रयत्नही झाला होता. कारण कोट्यवधी रुपयांची जमवलेली माया माणसाला भीतीमुळे कामाला येत नव्हती. जिकडे-तिकडे वेदना, दुःखाने बेजार झालेली माणसं दिसत होती. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले होते, अनेक दिवस कोंडून राहिल्याने उपासमारी झाल्याने कामगार, हातावरची माणसं मीठ-पीठ घेऊन अनवाणी पायांनी लहान मुले, बायका वृद्ध नातेवाईकांना घेऊन गावाकडं पळत होती. अनेक जणांचा रस्त्यामध्ये वाहनाखाली, रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला होता. जवळची प्रिय माणस मयत झाल्यानंतर शेवटचे तोंड पाहणारी माणस प्रेताला “ममी”च्या रुपात पाहू लागली होती.
एरवी अंत्यविधीला शेवटची पाणी देण्याची इच्छा असणारी माणस आपल्याच नातेवाईकाला अंतिम तिलांजली देण्यासाठी हद्दपार करून जेसीबीचा सुद्धा वापर करू लागली होती. माणुसकी पारच मरुन गेली होती. फक्त निवडक डॉक्टर, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी, काही प्रमाणात पोलीस वगळता संपूर्ण यंत्रणा गायब होऊन बसली होती. नाती तुटल्याने मुलांनी आईबापांचा अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी फक्त तहसीलदार आणि प्रांतासारख्या दोन दैवी शक्ती असणाऱ्या कोरोना योध्यांवर सोडली होती. सर्व जण जीव वाचवण्यासाठी लपत असतांना ही दोन माणस स्वतःचा जीव धोक्यात घालून माणसातला माणूस जिवंत आहे ह्यांची जगाला जाणीव करून देत होती.
सरकार इतिहासात पहिल्यादा गुन्हेगार नसलेल्या जगण्याच्या आशेने धावणाऱ्या निरपराध माणसाला पकडून “क्वारंटाईन” नावाच्या तुरुंगात डांबून ठेवत होत. अदृश्य आजाराच्या भीतीने सरकार नावाची यंत्रणा घाबरून गेली होती. वाहन, विमान, रेल्वे असून सुद्धा गरीब माणसांना जड पावलांनी हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. रोग तर बाहेर देशात पैसा कमवायला गेलेल्या श्रीमंतांनी आणला. त्याचा त्रास आम्हा गरिबांना का? असा प्रश्न ते स्वतःला विचारून ही गरीब माणस आपल्याच कर्माला दोष देत होती.
अंतराळात प्रवास करून मंगळावर, चंद्रावर वस्ती करण्याची स्वप्ने रंगावणाऱ्या माणसाचे पाय पहिल्यादाच जमिनीला टेकले होते. माणूस काही करू शकतो ह्या वृत्तीला निसर्गाने छेद दिला होता. निसर्गाची ताकद पहिल्यांदाच माणसाला दिसली होती. रूप, सौंदर्याचा, धनाचा गर्व कधीच संपला होता. दाढी आणि डोकी वाढलेले तरुण माणसं दहाव्याला केस कापतो तसे घरीच अश्मयुगीन आदिमानवासारखी घरीच केस कापू लागली होती .
चॅनेलवाले दिवसभर बातम्या रंगवत होते. टीआरपी कमवत होते. मोठा प्रेषक वर्ग भेटला आणि विषयसुद्धा, अंदाजपंचे आजारात इतकेच लोक मरतील, कोरोना अमक्याने होतो, तमक्याने होतो. इंग्लंड, अमेरिका तर खूपच श्रीमंत देश. कमी लोकसंख्या असलेले तरी हॉस्पिटलमध्ये जागा नाही आपल्या देशात तर काहीच सोय नाही. अवघड घडणार असे सांगून औषध येणारच नाही अश्या प्राइम टाइम चर्चा घडू लागल्या. एक्सपर्ट लोकांची मत घेऊ लागले, सामान्य माणूस रटाळवाण्या चर्चांना कंटाळून गेला होता. बाहेर पडल्यावर कोरोना होईलच या धास्तीने मिळेल ते खाऊन घरातच जगू लागला होता.
२०२१ सालात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही डॉक्टर, औषध विक्रते, आणि लॅब चालक ह्यांच्या संगनमताने सामान्यांना खोटे पेशंट बनून त्याच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या होत्या, मास्क घातलेले चेहरे, कोरोना किटमध्ये हिंडणारे कोरोना योद्धे, संसर्ग पसरू नये म्हणून प्लास्टिकच्या कागदात इजिप्त देशातील मम्मी सारखी पॅक केलेली प्रेते, घरातील व्यक्ती मयत झाल्याने बळजबरीने त्याचे क्वारंटाईन केलेले नातेवाईक. डॉक्टर, ऑक्सिजन सिलेंडर, बेड वाचून तडफडून मरणारी हजारो माणसं, जाळायला कमी पडलेले सरपण, गंगेत बेवारस तरंगणारी प्रेते अश्या सर्व परिस्थितीला लोकांनी धैर्याने तोंड देऊन मात्र त्यातून मार्ग काढला. आणि आज आपण कोरोना मुक्तीकडे वाटचाल केली.
डॉक्टर, शास्त्रज्ञांच्या फळीने संशोधन करून आजारावर जवळजवळ मात केली. जग पूर्वपदावर आले आहे. भीती जरी संपली तरी सुद्धा माणसाला २०२०-२०२१ साल हे विसरता येणार नाही. कोट्यवधी लोक जगात आजाराने भरडली होती. एकट्या भारतात सन २०२२ अखेरपर्यंत ४,५०,००० लाख लोक कोरोनाने मयत झाली होती. लाखोंनी कुटुंबातील कर्ती माणसं गमावली होती. कुटुंबाचे कुटुंब बेचिराख झाले. लहान वयातच आई-वडील मरण पावल्याने लहानग्यांना अनाथ आश्रमाची पायरी चढण्याची वेळ आली. असंख्य “कोरोना योद्ध्यांचा” बळी देऊन जगण्याचा संग्राम काही अंशी जिंकून, अनिश्चितेचा अंधार संपवणारी ती दोन वर्ष होती. सरकारने मोफत धान्य व आर्थिक मदत देऊन माणसं जगवण्याची एक मोठं आव्हान पार पाडले होतं.
माणुसकी संपली असं म्हणत माणूस परत माणसात यायला लागला. खरतर मावळणारा सूर्य उगवतो आणि अंधाराला दूर करतो. असाच आजाराबद्दलचा अज्ञानाचा अंधार जगातील शास्त्रज्ञाने दूर केला आहे. प्रकाशाकडे नेणारा नवीन दिवस जगाने पाहिला. खरंतर वेदना खूप गंभीर आहे अशा शब्दात वर्णन करता येणार नाही इतक्या कमी शब्दात मांडता येणार नाही. जरी या शतकात ‘कोरोना’ नावाचे वादळ हा हादरा देणारा असला तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जीवनाची नौका वादळातून सारण्याची शक्ती माणसाला निर्माण झालेली आहे. लढण्याची प्रेरणा मिळाली आहे.
(लेखकाशी संपर्क मो. नं. ९९२१३८६९८४)

