रविवार विशेष लेख — प्रिय तुकाराम मुंढेजी, ह्या दलालांना आवरा…
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.

या खात्यांमध्ये सर्वाधिक जनतेची लूट करणारे खाते म्हणून ज्या खात्याकडे पाहिले जाते, ते म्हणजे अन्न व औषध प्रशासन खाते होय. अनेकांनी या खात्यात राहून स्वतःची बरकत करून घेतलीच; पण दलालांकरवी राज्याला खड्ड्यात घालण्याचे कामही तिथल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसते. यामुळे तिथल्या लुटीला पारावार राहिला नाही. शासन तर लुटले जातच आहे; शिवाय जनतेच्या लुटीलाही मर्यादा राहिलेली नाही. अर्थातच विषय आहे तो औषध विक्रेत्यांच्या दुकानांत मिळणाऱ्या औषधांचा. या औषधविक्रीच्या माध्यमातून लोकांची होणारी लूट ही महाराष्ट्रासारख्या सजग राज्यात पाहायला मिळणे, हे राज्याचे दुर्दैव म्हटले पाहिजे. त्यात आपण रुजू होण्याच्या काही दिवस आधीच ऑनलाइन औषध खरेदीला विरोध म्हणून यातील उचापतींनी संपाचे हत्यार उपसले होते. हे हत्यार किती स्वार्थीपणाचे होते, हे नवे आयुक्त म्हणून आपल्या लक्षात आलेच असेल.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेप्रती असलेला विश्वास आणि घेतलेल्या निर्णयांचा लोकांना मिळणारा फायदा याकडे विशेष कटाक्ष असे. या योजनेच्या अंमलबजावणीप्रती मुख्यमंत्र्यांचा असलेला प्रामाणिक हेतू पाहून डॉ. शर्मा यांनी राज्यातील जनतेला मोफत औषध योजना सुरू करता येईल, असा विश्वास गेहलोत यांना दिला. योजनेचा पसारा पाहून नावाजलेल्या कंपन्यांची औषधे राज्यातील जनतेला मोफत देता येतील, यावर स्वतः गेहलोत यांचा विश्वास नव्हता. मात्र जे प्रयत्न करतील, अशा काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, या हेतूने मुख्यमंत्र्यांनी डॉ. शर्मा यांच्याकडून योजनेतील खाचखळगे समजून घेतले आणि योजना राबवण्यास हिरवा कंदील दिला.
याच योजनेतून पुढे जनरिक औषध योजना देशभर नावारूपाला आली. डॉ. शर्मा हे स्वतः डॉक्टर असल्याने कोणते औषध किती रुपयांपर्यंत विकले गेले पाहिजे, याची साखळीच त्यांनी पुढे आणली. अगदी डोकेदुखीपासून आराम मिळावा म्हणून वापरात येणारी जी गोळी रुपया-दीड रुपयाला विकली जाते, तिची प्रत्यक्ष किंमत पाच-दहा पैसे इतकीच असल्याचे शर्मा यांनी पटवून दिले. राज्यातील सरकारी इस्पितळांना लागणाऱ्या औषधांसाठी विशेष जागतिक निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय डॉ. शर्मा यांनी घेतला. त्यात औषधांच्या किंमती अत्यंत कमी नोंदवल्या गेल्या. कर्करोगासाठी लागणाऱ्या किमो सलाईन आणि त्यातील इंजेक्शनची किंमत तेव्हा १ लाख ३० हजार रुपयांपर्यंत मोजली जायची. इतक्या मोठ्या खर्चामुळे अनेकांना उपचार करणेही अशक्य व्हायचे. परिणामी मृत्यू अटळ असायचा.