रविवार दि. २४ मार्च, अहमदनगर
अहमदनगरमधील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात संगमनेरमधून अटक केलेल्या उद्योजक अमित पंडित याची जिल्हा न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठाडीत रवानगी केली आहे. त्यामुळे आता पंडितला जामीन मिळण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.
नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात संचालकांसह काही कर्जदार देखील आरोपींच्या पिंजऱ्यात अडकले आहे. संगमनेरमधील उद्योजक आणि अमृतवाहिनी बँकेचा काही काळ अध्यक्ष असलेल्या अमित पंडितने ३३ कोटी रुपयाहून अधिक रकमेचा कर्जघोटाळा केल्याचे बोलले जाते. फॉरेन्सिक ऑडिट नंतर आरोपींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आत्तापर्यंत या घोटाळ्यामध्ये १०५ आरोपी निष्पन्न झाले आहे. बडा कर्जदार असलेल्या पंडितचाही समावेश आहे.
गेल्या आठवड्यात शनिवारी (ता. १६ मार्च) संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या आदेशावरून राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने पंडितला अटक करत न्यायालयासमोर उभे केले असता २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती.
रविवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पंडितला पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने ६ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत. पोलीस कोठडी दरम्यान पंडित यांच्याकडून काय माहिती उपलब्ध झाली हे अद्याप समोर आलेले नाही.
एका बँकेचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेऊन ते थकीत करायचे, कंपनीच्या नावाचे कर्ज फेडण्यासाठी फसवणूक करून पत्नी व मुलाच्या नावाने कर्ज घेऊन ते थकीत करायचे असा घोटाळा पंडितने घातल्याचे पोलीस तपासात व ‘फॉरेन्सिक ऑडिट’ अहवालात यापूर्वीच नमूद करण्यात आले आहे.


