सोमवार, दि. १५ एप्रिल
देशात लोकसभा निवडणूक आचारसंहिता १६ मार्चपासून सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अद्याप सुरुवात झाली नसली तरीदेखील आचारसंहिता भंगाच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्याची व त्यातील बहुतांशी तक्रारीचे निराकरण केल्याची माहिती आचारसंहिता कक्षाकडून देण्यात आली आहे.
सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आलेल्या शंभर टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर ई-मेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार किरण देवतरसे यांनी दिली.
अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी निवडणूक होत आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले असून त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. प्रमुख चारही उमेदवारांना पक्ष बदलाचा दांडगा अनुभव असल्याने ते आपल्या सध्याच्या पक्षाचे महती सांगताना एकमेकांवर जिव्हारी लागणाऱ्या टीका करत आहे. उमेदवारांच्या पक्ष बदलूपणामुळे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते मात्र संभ्रमात सापडले आहे. ज्याच्यावर आतापर्यंत टीका केली त्याचाच झेंडा घेऊन मतदारांपर्यंत जाण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आल्याने त्यांच्यात अद्याप उत्साह संचारल्याचे दिसत नाही.
दुसरीकडे मात्र आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देखील सुरू झाल्या आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यापासून आचारसंहिता भंगाच्या तक्रारीबाबत प्रशासन देखील सतर्क झाल्याचे दिसते.


