बुधवार, दि.१७ एप्रिल
पाटाच्या कडेला खेळण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावंडाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना बुधवारी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली. संगमनेर मध्ये राम नवमी उत्सव जल्लोषात साजरा होत असताना दोघा भावंडाच्या मृत्यूच्या या वृत्तामुळे संगमनेरात दुःखाची छाया पसरली.

ऋतिक सारंगधर पावसे (वय १२ वर्ष) व प्रणव सारंगधर पावसे (वय ८ वर्ष, दोघे रा. हिवरगाव पावसा ता. संगमनेर) अशी दोघा मृत भावंडांची नावे आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री उशिराने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दुर्दैवाची बाब म्हणजे वर्षभरापूर्वीच या मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला. तर तळ्यात तरंगलेल्या चपलेवरून मुलांच्या मृत्यूची ही बाब लक्षात आली. अनुक्रमे पाचवे आणि तिसरी शिक्षण घेणारे दोघे भाऊ राम नवमीची शाळेला सुट्टी असल्याने दुपारी जेवल्यानंतर घराबाहेर खेळण्यासाठी पडले होते. सायकल वरून खेळता खेळता ते काही अंतरावर असलेल्या पाटाजवळ रहात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते. तेथूनच खेळत खेळत ते शेततळ्याजवळ पोहोचले.
खेळता खेळता पाय घसरून ते शेततळ्यात पडले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेततळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा प्रकार कोणाच्या लवकर लक्षात आला नाही. मात्र पाण्यात तरंगणाऱ्या चपला बघून काहीतरी अघटीत घडल्याच्या संशयाने शेततळ्याजवळ जमलेल्या लोकांनी शेततळ्यात शोध घेतला असता तळाशी पाण्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. संगमनेर तालुका पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. उपचारासाठी दोन्ही मुलांना घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकाराने तालुक्यात दुःखाची छाया पसरली आहे.
यासंदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढूमने यांनी दिली आहे.


