शुक्रवार, दि.१९ एप्रिल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा देशात सरकार आल्यास तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार असल्याचे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी धाराशिवमध्ये प्रचार सभेत केले आहे.
पवार म्हणाले, पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना गरिबांना वीजबिल माफी केली होती. सुशीलकुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली आणि पहिले वीज बिल शून्याचे दिले. मात्र नंतर पुन्हा आधीसारखे बिल देण्यास सुरुवात झाली. असे करणे परवडत नाही. मात्र मोदी हे कोणतेही काम मागील पुढील विचार करून करतात.
”राज्यात कार्यक्रमासाठी जेव्हा मोदी येतात, त्यावेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची आम्हाला संधी मिळते. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. आता ३०० युनिटपर्यंत जे वीज वापरतात, त्यांना येथून पुढे तिसऱ्यांदा मोदींचे सरकार आल्यावर वरील युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.”असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. विकासासाठी आम्ही महायुतीमधून लढतोय. विकासाकरिता आम्हाला राज्याचा देखील विकास करून घ्यायचा आहे. केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला या कामासाठी लागणार आहे. धाराशिवमध्ये माझ्या सासरवाडीत एवढी मोठी गर्दी पहिल्यांदा पाहिली. गेली दहा वर्षे नरेंद्र मोदींनी या देशाचे नेतृत्व केले. ३ कोटी घर देण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.


