सोमवार, दि.२२ एप्रिल
पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय राहिले नसून ते आत्ता वसुलीचे कार्यालय झाले आहे. मोदी सगळ्यात मोठे हप्ता बहादूर आहेत. मोदींनी ईडी लावली. सीबीआय लावली. आयबी मागे लावली. इन्कम टॅक्स विभाग मागे लावला. यंत्रणा येत होत्या. नोटीस दिल्या, रेड केल्या. पण एकाला आतमध्ये घातले का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
राज्यात महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून २० पेक्षा अधिक ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला लोकसभेतून निवडणूक लढवत असून यासाठी या मतदारसंघात त्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. रविवारी (ता. २१ एप्रिल) झालेल्या मूर्तिजापूर येथील सभेतून आंबेडकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.
आंबेडकर म्हणाले, भाजप आणि नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने मुसलमानांच्या विरोधात नसून ते केवळ तसं भासवत आहे. ते देशातील हिंदूंच्या विरोधात आहे. ते मुसलमानांच्या विरोधात नसून केवळ तसे भासवत आहे. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून किती भारतीय कुटुंबांनी देश आणि भारताचे नागरिकत्वही सोडले असा सवाल उपस्थित करत आपण हे गुगलवर तपासू शकता, याबाबतची सर्व आकडेवारी आपल्याला मिळेल असे सांगत त्यांनी मोदींना कंटाळून देशभरातील १७ लाख हिंदू कुटुंब देश सोडून गेल्याचा गंभीर आरोप केला.
ज्या १७ लाख हिंदू कुटुंबांची संपत्ती ५० कोटी पेक्षा जास्त आहे त्यांना नामोहरण करण्यात आले. मानसिक त्रास दिला गेला आणि यामुळे कंटाळून त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडले व परदेशाचे नागरिकत्व घेतले असा दावा आंबेडकरांनी केला आहे.
तसेच, स्मार्टसिटी म्हणजे शहरातील कचरा रोज उचलला पाहिजे. स्मार्ट सिटी म्हणजे विना खड्ड्याचा रस्ता असतो. पण कापसाला भाव नाही. याच्याकडे लक्ष न देता, सरकार फालतू गोष्टींमध्ये लक्ष घालू लागले आहे. या गावातील भटक्या विमुक्त जातीतील व्यक्तीतील लोकांना सांगितले तर तो पूर्वीच्या काळात जेलमध्येच असायचा. कागदपत्र नसले तर तुम्हाला जेलमध्ये टाकू. राज्यघटना म्हणते ज्याचा जन्म भारतात झाला तो भारतीय नागरिक आहे. हे म्हणतात, कागद दाखवा. असंतोष कसा वाढेल, माणसात भिती कशी राहिल, असे प्रयत्न यांच्याकडून होत असल्याचा आरोपही आंबेडकरांकडून करण्यात आला आहे.


