सोमवार, दि.२२ एप्रिल
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाची सांगता आज होत आहे. या हंगामात कारखान्याने १० लाख ८५ हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी ऊस गाळप केले असून यापुढील काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२०२४ च्या ऊस गळीत हंगामाची सांगता थोरात यांच्या उपस्थितीत झाली, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. समवेत व्यासपीठावर कांचनताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, हिरालाल पगडाल, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, गणेश कारखान्याचे व्हा. चेअरमन विजय दंडवते, विक्रांत दंडवते, अविनाश सोनवणे, ॲड. रामदास शेजुळ आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १० लाख मेट्रिक टन ऊस निर्मिती झाल्यास उत्पादन खर्च कमी होऊन कारखान्याची अर्थव्यवस्था आणखी चांगली होणार आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणखी चांगला भाव देता येईल. डेव्हलपमेंट विभाग व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी जास्तीत जास्त उत्पादनावर भर देण्याची आवश्यकता आहे. दुष्काळी परिस्थितीत देखील कारखान्याने सुमारे अकरा लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले.
खाजगी उद्योगात फारसे निर्बंध नाहीत त्या उलट परिस्थिती सहकारी उद्योगांमध्ये आहे. सरकारने साखर कांदा ग्राहकांना स्वस्त दराने द्यायला हवा मात्र यासाठी शेतकऱ्याचे नुकसान देखील व्हायला नको. यासाठी सातत्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने अनुदानाच्या रूपाने मदत केलीच पाहिजे. निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी आल्यामुळे काही प्रमाणात मदत झाली आहे. मात्र या पाण्याचे नियोजन चांगले होणे गरजेचे आहे. या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आगामी काळात काम करावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले, दुष्काळी परिस्थितीतही न डगमगता कारखान्याने चांगले गाळप करताना वीज निर्मितीसह अमृत शक्ती खत व इतर उपपदार्थांची निर्मिती केली.
१० कोटी ५१ लाख युनिटची वीज निर्मिती…
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहा लाख मेट्रिक टनाच्या पुढे गाळप करणे हे सांघिक काम आहे. दुष्काळी परिस्थिती ११.५०% रिकवरी कारखान्याने मिळवली असून १० कोटी ५१ लाख युनिटची वीज निर्मिती केली आहे. – बाबा ओहोळ.
संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, अभिजीत ढोले, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, संपतराव गोडगे, अनिल काळे, विनोद हासे, मंदाताई वाघ, मीराताई वर्पे, संभाजी वाकचौरे, सुभाष सांगळे, विक्रांत दंडवते, सुरेश झावरे, सुरेश थोरात, विष्णुपंत रहाटळ, ॲड. सुहास आहेर, ॲड. उदय ढोमसे, सेक्रेटरी किरण कानवडे यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.



