शुक्रवार, दि.२६ एप्रिल
लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणात कुठेही दिसणार नाही, फोन टॅपिंग प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत होती, असे मोठे विधान करत पहिल्या दोन टप्प्यातील तेरा पैकी दहा जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई दक्षिण मध्य मतदार संघातील उमेदवार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी राऊत बोलत होते.
आतापर्यंत राज्यात दोन टप्प्यात मतदान पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात मतदान झाले तर आज आठ मतदारसंघात मतदान होत आहे. या दोन्ही टप्प्यातील तेरा पैकी दहा जागा महाविकास आघाडी जिंकेल, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नखशिखांत भ्रष्टाचारी असल्याचाही आरोप त्यांनी केला. आता त्यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत आहे. सत्तेत असताना तुम्ही नेत्यांचे फोन टॅपिंग केले, त्यामुळे आता मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असं म्हणून कसं चालेल. आम्ही साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येथे आलो, मुख्यमंत्र्यांची शिर्डीत धावाधाव कशासाठी सुरू आहे ते माहित नाही. त्यांचा येथील उमेदवार पडणार हे निश्चित आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कचाकच बटन दाबा प्रकरणात निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या क्लीनचीट संदर्भात बोलताना ते म्हणाले, निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा आहे. अतिरिक्त शाखा असणाऱ्या आयोगाकडून निष्पक्ष कामाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. उद्या केंद्रात आमचे सरकार येईल. त्यानंतर घटनात्मक संस्थांची फेररचना केली जाईल. या संस्था सध्या सारख्या राजकीय हस्तक्षेप न होता काम करतील याकडे आम्ही लक्ष देऊ असे देखील राऊत यांनी सांगितले.



