शनिवार दि.२७ एप्रिल
देशाच्या सीमांवर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दहा वर्षात ज्या हजारो सैनिकांच्या हत्या झाल्या त्या सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर माता यांना देशासाठी मंगळसूत्र बलिदान कराव लागलं, त्या मंगळसूत्रांचा हिशेब कोण देणार? असा घनाघाती सवाल करत जो महिलांच्या मंगळसूत्राला हात घाल तो ‘भारतीय जनता पक्षच मंगळसूत्र चोरांची टोळी’ असल्याचा हल्लाबोल शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
अकोले (अहमदनगर) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शुक्रवारी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, अमित भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वर्पे, संभाजी ब्रिगेडचे संदीप कडलग, काँग्रेस पक्षाचे शिवाजी नेहे, जगदीश चौधरी, राजू पाटील, अशोक गायकवाड उपस्थित होते.
राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्र आणि देशातील निवडणुकाविषयी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे आता त्यांनी त्यांच्या आवडीचा हिंदू-मुसलमान असा खेळ सुरू केला असून लोकसभेच्या दोन टप्प्यातील मतदानानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोकसभेचे मतदान झालेल्या पहिल्या टप्प्यातील १०८ जागांमध्ये भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार आहे.
महाराष्ट्रात विदर्भातील पाच पैकी पाच जागांवर महाविकास आघाडी विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त झाल्याने आणि दुसऱ्या टप्प्यात आठ पैकी आठ जागांवर महाविकास आघाडी ही आघाडीवर राहणार असल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. महाराष्ट्रात महाविकास (इंडिया) आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपमुळे देशातील महिलांचे मंगळसूत्र धोक्यात आले आहे. देश विकायला काढलाय. तुमच्या उपद्रवामुळे महिला, माता भगिनींना आपली मंगळसूत्रे गहाण ठेवावी लागली. विकावी लागली आहेत. मंगळसूत्रांचं बलिदान करावे लागलं हे गेल्या ७० वर्षात कधी झालं नाही. नोटबंदी करून संपूर्ण देशात घराघरात हाहाकार यांनी घडवून आणला. या काळात महिलांना आपले मंगळसूत्र विकून गहाण ठेवून काही काळ आपले घर चालवावे लागले. अचानक केलेल्या लॉकडाऊनमध्ये कारखाने, उद्योग बंद, मुलं बाळं घरी. कर्ती माणसं घरी बसली तेव्हाही या देशातल्या महिला, भगिनींना घर चालवताना मंगळसूत्र विकून घर चालवावे लागले. बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण या महत्त्वाच्या गोष्टींसाठी गेल्या दहा वर्षात आपल्या मुलाबाळांसाठी मंगळसूत्र विकावे लागले. गहाण ठेवावे लागले.
देशाच्या सीमेवर आणि काश्मीर सारख्या राज्यात दहा वर्षात हजारो सैनिक मृत्युमुखी पडले. त्या वीर पत्नी आणि वीर मातांनी आपलं मंगळसूत्र देशासाठी बलिदान कराव लागलं त्याचा हिशोब कोण देणार असा गंभीर सवाल करत भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी हिंदुत्व असल्याचा टोला लगावला. देशातली भाजपची सत्ता उलथविण्याची ताकत महाराष्ट्रामध्ये आहे याची भीती मोदी-शहा यांना वाटते. कारण महाराष्ट्रात ठिणगी पडली की देशात वनवा पेटतो. आता तर महाराष्ट्रात शिवसेनेची मशाल पेटली आहे. तुमचे देशासाठी योगदान काय असा सवाल करील हा देश उभा करण्यात गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्याच शेतमालाला भाव मिळत नाही. याला जबाबदार कोण? दूध आणि कांदा याचे तर या सत्ताधाऱ्यांनी वाटोळे केले आहे. गुजरातचा दोन हजार टन पांढरा कांदा विकला जावा म्हणून निर्यात बंदी उठवली. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा नाही. गुजरात म्हणजेच देश आणि मी गुजरातचा पंतप्रधान आणि गृहमंत्री असे मोदी शहांना वाटते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपवायचं काम या सरकारने केल असून सुडाच राजकारण ते करीत आहेत.
ही निवडणूक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक भविष्य घडवणारी निवडणूक आहे. पुढील भवितव्याची निवडणूक आहे. आमचे भविष्य आम्ही घडवणार आहोत, मोदी शहा नाही. या देशाला पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान पंतप्रधानांची परंपरा आहे. त्या देशात ‘तुळशीमध्ये भांगेचे रोपटे’ निघावे असे ‘खोटे बोलणारा पंतप्रधान’ मिळाला हे दुर्दैव आहे. शिवसेनेचे चिन्ह मशाल सर्वत्र घराघरात पोहोचवा, ही मशाल नुसती पेटणारच नाही तर भडकणार आहे असेही राऊत यांनी सांगितले.
याप्रसंगी अमित भांगरे, मधुकर तळपाडे, संदीप वर्पे, संदीप कडलग, कॉम्रेड डॉ. अजित नवले, अशोक गायकवाड यांची भाषणे झाली. तर उपजिल्हाप्रमुख महेश नवले, रामा तिकांडे, तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ (पुर्व), संतोष मुर्तडक (पश्चिम), शहर प्रमुख शिवाजी शेटे, विधानसभा संघटक मधुकर तळपाडे, शहर संघटक नितीन नाईकवाडी, शहर समन्वयक प्रमोद मंडलिक, नंदकुमार वाकचौरे, सिताराम शेटे, भाऊसाहेब गोरडे, प्रदीप हासे, बाळासाहेब देशमुख, मंगलताई शेलार, जग्गू मैड, संदीप डोंगरे, विनोद देशमुख, राम सहाने, सचिन मुर्तडक, बाळा येलमामे, अर्जुन खोडके, गोरख घाणे, अमर कतारी, कैलास वाकचौरे, ॲड. दिलीप साळगट आदी उपस्थित होते.



