शनिवार, दि.२७ एप्रिल
काँग्रेसच्या सरकारने अनेकवर्ष राज्य केले. आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदे भोगले. पण जनतेला फक्त चॉकलेट दिले. दुसरीकडे आपण ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.
सांगली लोकसभा मतदारसंघात महायुती उमेदवाराच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली.
फडणवीस म्हणाले, या निवडणुकीत दोनच पर्यांय आहेत. एक पर्यांय नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी. एकीकडे आपली महायुती तर दुसरीकडे राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे. ही लढाई दोन व्यक्तिमत्वामधील आहे. आपल्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन आहे. त्या इंजिनबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लावले आहेत. ही आपल्या विकासाची ट्रेन आहे. या विकासाच्या ट्रेनमध्ये गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आहेत. महायुतीची ही गाडी सबका साथ सबका विकास म्हणत पुढे चालली आहे.
राहुल गांधी म्हणतात मी इंजिन, तर शरद पवार म्हणतात मी इंजिन, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन. आता त्यांच्याकडे कोणीही डब्बे लावायला तयार नाही. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे य़ा आहेत. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे. त्यांच्या इंजिनमध्ये जनतेसाठी जागा नाही.



