
वंचितला मतदान म्हणजे भाजपला मदत…
मंगळवार, दि.३० एप्रिल
देशभरात सुरू असलेला ईडी, सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, न्याय व्यवस्थेमधील दबाव, वाढलेली महागाई, बेरोजगारी, राज्या-राज्यात झालेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडलेले नाही, देशभरात निर्माण झालेली अस्थिरता यामुळे देशात भाजप विरोधात मोठी लाट निर्माण झाले असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०० जागाही मिळू शकणार नाही. याचबरोबर राज्यातील महायुतीचे सरकार जनतेला मान्य नसून महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत असल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडी ४० पेक्षा अधिक जागा मिळवेल असा विश्वास काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
सोमवारी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार शुभारंभावेळी थोरात बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, भाऊसाहेब वाकचौरे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, नांदेड येथील प्रा. यशपाल भिंगे, बीड येथील दादासाहेब मुंडे, बाबा ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, हिरालाल पगडाल, उत्तम घोरपडे, ज्ञानदेव गायकर, अमर कतारी, कैलास वाकचौरे, आरपीआयचे किरण रोहम आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवाराचे चिन्ह घराघरात पोहोचविण्याचे आवाहन करत थोरात म्हणाले, राज्यात सभा घेणाऱ्या पंतप्रधानांनी भाषणामध्ये दहा वर्षात केलेली विकास काम आणि पुढील पाच वर्षात करावयाची कामे याचा अहवाल जनतेला देणे अपेक्षित आहे मात्र पंतप्रधान केवळ धर्माचे राजकारण करत असून केंद्रीय यंत्रणांचा देशात गैरवापर सुरू आहे. न्यायव्यवस्था दबावाखाली आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. मनिपुरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाला. देशासाठी ऑलिंपिक जिंकणाऱ्या महिला खेळाडूवर अन्याय झाला. मात्र पंतप्रधानांनी याकडे लक्ष दिले नाही. देशभरात सर्वत्र अस्थिरता आणि अनागोंदी निर्माण झाली असून देशाच्या इतिहासात भाजपचा कालखंड हा काळा इतिहास म्हणून लिहिला जाईल.
सध्याचे महायुतीचे खासदार दहा वर्ष कोणाला दिसले नाही. कोणतेही विकासाचे काम नाही मात्र बढाया मारण्यात ते पुढे आहेत. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता देशाची लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी हा विकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.


डॉ. तांबे म्हणाले, देशात भाजपाविरोधी मोठी लाट निर्माण झाली आहे. मोदींच्या कार्यकाळात सर्व क्षेत्रात मोठे अपयश आले आहे. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले आहे. ही लोकशाही नसून हुकूमशाही निर्माण झाली आहे.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, दोन कोटी नोकऱ्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने देशांमध्ये मोठी बेरोजगारी निर्माण केली. गांधी परिवाराचा देशासाठी मोठा त्याग आहे. महागाईमुळे महिलांना मंगळसूत्र विकण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती भाजपने आणून ठेवली.
वंचितला मतदान म्हणजे भाजपला मदत…
वंचितकडून उभ्या असलेल्या उत्कर्षा रूपवते यांना काँग्रेसने कायम सन्मान दिला, मोठ्या संधी दिल्या. शिर्डी मतदार संघ काँग्रेसला मिळावा यासाठी आपण मोठा प्रयत्न केला हे सर्वांना माहीत आहे. रूपवते यांनी काँग्रेस सोडणे अत्यंत चुकीचे आणि दुःखदायक आहे. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून वंचितला मतदान करणे म्हणजे भाजपाला मदत करण्यासारखे ठरणार असल्याची टीका आमदार थोरात यांनी केली.


